वेंगुर्ले ता.१६: वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी हरिचरणगिरी येथील समुद्र किनाऱ्यावर आठ दिवसांपूर्वी आढळून आलेला तो मृतदेह आंबोली जाधववाडी येथील लक्ष्मण सुरेश जाधव (वय २५) यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. नातेवाईकांनी आज ओळख पटवली अशी माहिती वेंगुर्ले पोलीस ठाण्यातून देण्यात आली.
गुरूवार ९ मे रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अज्ञात पुरुषाचा मृतदेह वायंगणी हरिचरणगिरी समुद्रकिनाऱ्यावर
आढळून आला होता. वेंगुर्ले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह शवागृहात आणून ठेवला होता. तसेच या मृतदेहाबाबत कोणाला काही माहिती असल्यास कळवावे असे आवाहन केले होते.
दरम्यान लक्ष्मण जाधव हा वेंगुर्ले शहरातील एका हॉटेलमध्ये कूक म्हणून कामाला होता. ७ मे रोजी तो आणि त्याच्या सोबत असणारे सहकारी अनिकेत वेळकर हरिचरणगिरी आणि वसंत उर्फ समिर पेडणेकर होडवडा असे तिघे हरिचरणगिरी अनिकेत च्या घरी सकाळी गेले होते.
मात्र तेथे गेल्यावर काही वेळातच लक्ष्मण जाधव मी दोन दिवस कामावर येणार नाही. आपल्याला काम आहे असे सांगून तिथून निघून गेला होता. त्यामुळे तो घरी गेला असावा असा अंदाज या मित्रांना आला. तसेच घरी त्याच्या फोन लागत नव्हता. मात्र त्याच्या पत्नीने वेंगुर्ले येथे येऊन चौकशी केली व मिळालेल्या मृतदेहाची पाहणी केली असता तो आपला पती असल्याचे तिने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी ओळख पाटल्याची खात्री करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे.