सिंधुदुर्गच्या आरटीओ विभागात हप्तेखोरिचे काम, कारवाई नाही…

163
2
Google search engine
Google search engine

परशुराम उपरकरांचा आरोप; १५ दिवसात कारवाई न झाल्यास आंदोलन…

ओरोस,ता.३०: सिंधुदुर्गच्या आरटीओ विभागात मोठ्या प्रमाणात हप्तेखोरीचे काम सुरू आहे. आंबोली घाटात अवजड वाहतुकीला विरोध असताना कोणत्याही गाडीवर कारवाई केली जात नाही. जिल्ह्यात ओव्हरलोड वैध प्रवासी वाहतूक, मालवाहतूक बिनदिक्कत सुरू आहे. याला सर्वस्वी अधिकारी जबाबदार आहेत, असा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला.‌ दरम्यान या वाहतुकी संदर्भात येत्या पंधरा दिवसात योग्य ती कारवाई न झाल्यास आम्ही जिल्ह्यात मोठे आंदोलन उभारू असा इशारा त्यांनी दिला. श्री. उपरकर यांनी आपल्या समर्थकांसमवेत आज जिल्हा आरटीओ अधिकारी नंदकिशोर काळे यांची भेट घेतली. यावेळी जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध्य वाहतुकीचा त्यांनी पाढाच वाचला.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते आशिष सुभेदार, राजेश टंगसाळी, मंदार नाईक, अप्पा मांजरेकर, चालक युनियन चे अध्यक्ष विजय जांभळे, आबा चिपकर, स्वप्नील जाधव, रमेश शेळके, राहूल गावकर, अंकुश बोवलेकर, गितेश मळगावकर, नंदू परब आदी उपस्थित होते. यावेळी उपरकर यांनी आक्रमक भुमिका घेताना पुणे पोर्श कार प्रकरण हे बेकायदेशीर वाहतुकीचाच प्रकार असून अल्पवयीन मुलाने दोन जणांचा जिव घेतला त्याची आठवण करुन देत जिल्हयात देखील अशा प्रकारे अल्पवयीन मुलांकडून वाहने चालवून अपघाताचे प्रकार होत आहेत, ते रोखणे आरटीओचे काम आहे. अल्पवयीन मुले दुचाकी, चारचाकी गाड्या चालवत असून त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. खाजगी बस गाड्यांवर कमी वयाचे परप्रांतीय चालक भरले जातात तर रात्रीच्यावेळी मद्य प्राशन करुन खाजगी प्रवासी बसचे चालक गाडया चालवताना हमखास आढळून येतात परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही.

सिझनमध्ये खाजगी प्रवासी बसवाले क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरतात त्यामुळे कित्येवेळा अपघात घडले आहेत. त्यावरही कोणतीही कारवाई होत नाही. आंबोली घाटात अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली तरी रात्रीच्या वेळी चिरी घेवून गाड्या सोडण्याचे प्रकार सुरु आहेत. याकडे आरटीओ विभाग जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत असा आरोप केला.जिल्हयात अवजड वाहतुक करणार्‍या गाड्यांचे विमा, पासिंग, परमिट, परवाना असल्याबाबत कागदपत्र तपासणी होताना दिसत नाही. त्यामुळे आरटीओ विभाग हा हप्तेखोरीचा विभाग बनला आहे असा आरोप उपरकर यांनी केला. हायवेच्या निकृष्ठ व नियमबाहय कामामुळे कित्येकवेळा अपघात होत आहेत परंतु संबंधीत हायवे ठेकेदाराला एकही नोटीस बजावण्यात आलेली नाही. ही शोकांतीका आहे वाहतुक तसेच गाडयांचे लायसन, परवाने, परमीट काढण्यासाठी येणार्‍या ग्राहकांची एजंटांमार्फत लूट सुरु असून त्यातील काही हप्ते हे परिवहन विभागाच्या अधिकार्‍यांनाही जात आहेत त्यामुळे हा विभाग भ्रष्टाचाराचा कुरण बनला आहे असा आरोप करत येत्या पंधरा दिवसांत या सर्व तक्रारींवर कारवाई न झाल्यास सिंधुदुर्ग आरटीओ कार्यालयासमोर मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा उपरकर यांनी दिला.