वैभव नाईक यांनी उर्वरित चार महिने “एन्जॉय” करावे…  

159
2
Google search engine
Google search engine

समीर नलावडे, बंडू हर्णे यांची टीका; विरोधकांची बोलती बंद…

कणकवली, ता.१२ : कुडाळ, सावंतवाडी, कणकवली मतदारसंघात खासदार नारायण राणे यांना मोठे मताधिक्य मिळाले आहे. आमदार वैभव नाईक कुडाळ मधून पुन्हा निवडून येणार नाहीत. त्यामुळे त्यांनी शिल्लक असलेले चार महिने “एन्जॉय” करावेत, अशी टीका कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे आणि माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी केली. कणकवली शहरात खासदारकीच्या निवडणुकीत प्रथमच विजेत्या उमेदवाराला १७०७ एवढे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे आमच्या विरोधात सातत्याने पत्रकार परिषदा घेणाऱ्या विरोधकांची बोलती बंद झाली आहे, असेही श्री. नलावडे आणि श्री. हर्णे म्हणाले.

येथील भाजपच्या शहर कार्यालयात श्री. नलावडे आणि श्री. हर्णे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शहराध्यक्ष अण्णा कोदे उपस्थित होते.

श्री.नलावडे म्हणाले, कणकवली शहरात खासदार नारायण राणे यांना सर्वाधिक मताधिक्य देण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेली प्रचंड मेहनत यामुळे कणकवलीच्या इतिहासात प्रथमच एवढे मताधिक्य श्री. राणे यांना देता आले आहे. भाजपची ही घोडदौड अशीच पुढे सुरू ठेवली जाणार आहे. तत्कालीन केंद्रीय मंत्री नारायण राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून कणकवली शहरासाठी भरघोस निधी आला. विविध विकास कामे मार्गी लागली. त्यामुळे कणकवलीकरांनी खासदार नारायण राणे यांच्या बाजूने प्रचंड मताधिक्याचा कौल दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी आम्ही कणकवली शहरात सर्वाधिक मताधिक्य घेऊ असे जाहीर आव्हान विरोधकांना दिले होते. मात्र आमचे आव्हान विरोधक स्वीकारू शकले नाहीत.

श्री.हर्णे म्हणाले, कुडाळचे आमदार वैभव नाईक यांना माजी खासदार आणि ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांचा पराभव करायचाच होता. त्यामुळे त्यांची यंत्रणा ढिम्म राहिली. आता विधानसभा निवडणुकांसाठी चार-पाच महिन्यांचा अवकाश आहे तोपर्यंत आमदार वैभव नाईक यांनी आपली आमदारकी एन्जॉय करावी कारण येत्या विधानसभा निवडणुकीत लोकसभा निकालाची पुनरावृत्ती होणार आहे.