निवडणुकांचे कारण सांगून अधिकारी सुस्त; तात्काळ दखल घेण्याची मागणी…
कणकवली,ता.२४: दिव्यांग बांधवांना देण्यात येणारी पेन्शन गेले ३ महिने खात्यात जमा झालेले नाही. त्यामुळे दिव्यांग व्यक्ती व त्यांच्या कुटुंबियांची फरफट होत आहे. लोकसभा व कोकण पदवीधर निवडणुकीची धावपळ, असे कारण पुढे करून अधिकाऱ्यांकडून आपली जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र होणारा त्रास लक्षात घेता तात्काळ ही पेन्शन जमा करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावी, अशी मागणी दिव्यांग बांधवातून होत आहे.
शासनाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना संजय गांधी दिव्यांग पेन्शन योजना देण्यात येते. मात्र गेल्या ३ महिन्याचे मानधन अद्याप संबंधितांच्या खात्यात जमा झालेले नाही. लक्ष वेधून सुध्दा अधिकारी गप्प आहेत. त्यामुळे गेले २ महिने आणि सुरू असलेला महिना असे ३ महिने पेन्शन जमा झालेले नाही. त्यामुळे तात्काळ ही रक्कम खात्यात जमा करा, अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशारा दिव्यांग बांधवांच्या माध्यमातून देण्यात आला आहे.