आशिष सुभेदार; पुन्हा प्रकार घडल्यास गप्प बसणार नाही, मुख्याधिकाऱ्यांना इशारा…
सावंतवाडी,ता.२५: शहरातील जीर्ण झालेल्या झाडांमुळे वारंवार अपघात होत आहेत, त्यामुळे धोकादायक असलेली झाडे तोडण्यासाठी पालिका प्रशासनाकडून योग्य ती भूमिका घ्यावी, अशी मागणी उपरकर समर्थक आशिष सुभेदार यांनी मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्याकडे केली आहे.
याबाबत पालिकेकडे वारंवार मागणी करून देखील दुर्लक्ष केले जाते ही दुर्दैवाची बाब आहे. शहरात दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पुन्हा असे प्रकार घडल्यास गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.
याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे. यात असे म्हटले आहे की, आज खासकिलवाडा वटसावित्री परिसरात अचानक झाड तुटून रस्त्यावर आले यात येथील युवक सुदैवाने बचावला. पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने शहरात जीर्ण झालेली झाडे ही तात्काळ तोडण्यात यावीत जेणेकरून होणारे नुकसान टळेल, मात्र वारंवार दुर्लक्ष होत असेल तर ही दुर्दैवाची बाब आहे. त्यामुळे लवकरात लवकर जीर्ण झाडे तोडावीत अन्यथा गप्प बसणार नाही, असे सुभेदार यांनी प्रसिद्धी पत्रकार म्हटले आहे.