सिंधुदुर्गातील विविध प्रश्नांवर आमदार वैभव नाईकांनी उठविला अधिवेशनात आवाज…

122
2
Google search engine
Google search engine

कुडाळ,ता.२९: शाळा सुरू होऊन एक महिना होत आला तरी अजूनही काही शाळांमध्ये गणवेश वाटप झालेले नाही. सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात पाऊस असल्याने शाळांची नादुरुस्त छप्परे कोसळत आहेत. त्यामुळे शाळांच्या दुरुस्तीसाठी शासनाने निधी द्यावा, अशी मागणी कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी आज पावसाळी अधिवेशनात केली.

दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरळीत नसल्याने अनेक आंदोलने होत आहेत. अधिकारी आणि कर्मचारी पदे रिक्त असल्याने व विद्युत सामग्री उपलब्ध नसल्याने वीज पुरवठा सुरळीत होत नाही.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात काजू उत्पादन होते. परंतु बाहेरच्या देशातील काजूची आयात केल्याने आपल्या काजूचे उत्पादन, काजूची कॉलीटी चांगली असून सुद्धा काजूला चांगला दर मिळत नाही. त्यामुळे आयात आणि निर्यात धोरणात काही बदल केले पाहिजेत तरच ११० ते १२० रु पर्यंत खाली आलेला काजूचा दर किमान १५० ते १६० पर्यंत जाऊ शकतो. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ११० रु दरात काजू उत्पादनासाठी झालेला खर्च देखील भागत नाही.

सिंधुदुर्गातील शासकीय मेडिकल कॉलेज जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीत सुरू झाले आहे. मात्र याला तीन वर्षे होऊनही नवीन इमारतीच्या बांधकामाला अजून सुरुवात झाली नाही. अजूनही डॉक्टर आणि चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांची भरती झाली नाही. नवीन मेडिकल कॉलेज उभारताना जुन्या मेडिकल कॉलेजना देखील योग्य सोयी सुविधा द्याव्यात.

जलजीवन मिशन योजनेतील अनेक कामे अपूर्ण आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही काम गेल्या दोन वर्षात पूर्ण होऊ शकले नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्या कामांना वेग मिळाला पाहिजे. योजनेचा फायदा लोकांना झाला पाहिजे.

पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान जाहीर केले आहे. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांना हे अनुदान मिळाले नाही. खावटी कर्जाची देखील माफी झाली नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामान केंद्रांची संख्या वाढविली पाहिजे. अशा अनेक समस्या आणि प्रश्नांकडे आमदार वैभव नाईक यांनी राज्यपाल आणि राज्यशासनाचे लक्ष वेधत ते सोडवण्याची मागणी केली.