तात्काळ चर बुजवा अन्यथा रस्तात वृक्षारोपण करू ; आशिष सुभेदारांचा इशारा…
सावंतवाडी ता.३०: मोबाईल कंपन्यांकडून ऐन पावसाच्या तोंडावर शहरातील तसेच अंतर्गत रस्त्यावर केबल घालण्यासाठी खोदण्यात आलेले चर अतिशय धोकादायक बनले आहेत. त्या ठिकाणी टाकण्यात आलेली माती वाहून गेल्यामुळे खड्डे पडले असून त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दखल घेऊन हे खड्डे तात्काळ बुजवावेत. अन्यथा त्या खड्ड्यात वृक्षारोपण करू, असा इशारा परशुराम उपरकर समर्थक आशिष सुभेदार यांनी दिला आहे.
सावंतवाडी शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यावर तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेल्या रस्त्यावर काही मोबाईल कंपन्यांकडून केबल घालण्यासाठी खोदाई करण्यात आली होती. पावसाळ्याच्या तोंडावर विरोध असताना सुद्धा हे काम करण्यात आले होते. परंतु काम पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी पडलेले खड्डे तसेच आहेत. याबाबत वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधून सुद्धा त्या ठिकाणी कोणीच दखल देत नाही. तर मोठे चर पडल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. गाड्या खराब होत आहेत. त्यामुळे पालिका प्रशासन व बांधकाम विभागाने तात्काळ दखल घेऊन हे खड्डे बुजवावेत. अन्यथा त्या वृक्षारोपण करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.