जयेंद्र परुळेकरांचा आरोप; आचारसंहितेचे कारण नको, सिटीस्कॅन मशीन तात्काळ सुरू करा…
सावंतवाडी,ता.०१: मंत्री दीपक केसरकर आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी सावंतवाडी शहराचे वैभव असलेल्या अर्बन बँकेला अडचणीत आणले, असा आरोप करीत बॅक बुडीत जाण्यासाठी कोणाला कशी कर्ज दिली याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणी शिवसेनेचे प्रवक्त डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी आज येथे केली. दरम्यान मल्टीस्पेशालिटीचे गाजर दाखविणार्या केसरकरांनी आहे ते हॉस्पिटल सुधारावे त्या ठिकाणी लोकांना डॉक्टर आणि औषधे उपलब्ध करुन द्यावीत, सीटिस्कॅन यंत्रणा सुरू करावी, आचारसंहितेचे कारण नको, आता लोकांचे आचार घालण्याची वेळ आली, असे ही त्यांनी सुनावले.
श्री. परुळेकर यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अर्बन बँकेच्या विलीनीकरणावरुन श्री. केसरकर व त्यांच्या सहकार्यांना “टार्गेट” केले. ते म्हणाले, या ठिकाणी १९४५ पासून सावंतवाडीचे वैभव असलेल्या अर्बन बँकेेचे विलीनीकरण करावे लागले ही शरमेची बाब आहे. या ठिकाणी केसरकर मंत्री होेते. त्यांनी स्वतः बँकेत अध्यक्ष म्हणून काम केले आहे. मग ती बँकेचा उर्जितावस्था आणण्यासाठी प्रयत्न का केले नाही? असा उलट सवाल त्यांनी केला. त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या लोकांनी चुकीच्या पध्दतीने कर्ज वाटप केले, वसूली केली नाही. त्यामुळे शेतकर्यांसाठी निर्माण करण्यात आलेली ही बँक बुडीत निघाली. याचे मोठे दुख आहे. याबाबत सर्वांनीच आत्मचिंतन करणे काळाची गरज आहे.
ते पुढे म्हणाले, या ठिकाणी केसरकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे गाजर दाखवून लोकांची दिशाभूल करीत आहे. परंतू नवे हॉस्पिटल उभारण्यापेक्षा आहे त्या ठिकाणी चांगली सेवा द्या, सिटीस्कॅन यंत्रणा कार्यान्वित करा, आचार संहितेचे कारण सांगून लोकांचे आचार होण्याची वेळ आली. त्यामुळे आता पुरे करा, असे ही ते म्हणाले.