परराज्यातील मजूर आणि बेघरांसाठी व्यवस्था; ५५८ व्यक्तींनी घेतला आसरा…
सिंधुदुर्गनगरी ता.०५: परराज्यातील मजूर, कामगार तसेच बेघर यांच्यासाठी जिल्ह्यात १५ निवारा केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. या निवारा केंद्रामध्ये ५५८ व्यक्तींनी आसरा घेतला असून त्यांच्या निवासासह भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
आंबोली रेस्ट हाऊस, शेर्ले जिल्हा परिषद शाळा, बांदा, आंबोली पब्लिक स्कूल, मळगाव, देवळी, नांनरुख, घोटणे, शरवण, मालवण, कुडाळ, निवजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिंगुळी, कणकवली येथील भगवती मंगल कार्यालय आणि खारेपाटण या ठिकाणी ही निवारा केंद्र उभारण्यात आली आहेत. या सर्व ठिकाणी राहणाऱ्या व्यक्तींच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली असून एक आरोग्य सेवक या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या केंद्रांमधील व्यक्तींना सध्याच्या परिस्थितीमध्ये घ्यावयाची काळजी आणि आरोग्या विषयी जागरुकता याविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात संचारबंदी असतानाही विनाकारण दुचाकी वरुन फिरणाऱ्यांवर 14 गुन्हे दाखल करण्यात आले असून 17 वाहने जप्त करण्यात आली आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षामध्ये 22 रुग्ण दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 63 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून 56 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. उर्वरीत नमुन्यांचा अहवाल अजून प्राप्त झालेला नाही. आरोग्य यंत्रणेमार्फत आज एकूण 431 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात 339 व्यक्तींना घरीच अलगीकरण करण्यात आले असून संस्थात्मक अलगीकरण कक्षामध्ये 53 व्यक्तींना ठेवण्यात आले आहे