संजू परब; वेत्ये,इन्सुली येथील खाणीवरील अनधिकृत उत्खनन रोखा, अन्यथा आंदोलन…
सावंतवाडी,ता.२५: वेत्ये आणि इन्सुली या भागात मोठ्या प्रमाणात असलेल्या परप्रांतीयांच्या दगडाच्या खाणींकडुन परिसरातील घरांना धोका निर्माण होत आहे, घरांना तडे गेले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ कारवाई न झाल्यास बेमुदत उपोषण करू, असा इशारा नगराध्यक्ष तथा भाजपाचे प्रवक्ते संजू परब यांनी आज येथे दिला. दरम्यान त्या ठिकाणी होणाऱ्या अनधिकृत खाणीला तहसीलदार आणि प्रांत हे दोन्ही अधिकारी जबाबदार आहेत. त्या ठिकाणी सुरु असलेल्या अनधिकृत खाणींचा लवकरच पोलखोल करू, असा इशारा ही त्यांनी यावेळी दिला.
आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
श्री परब पुढे म्हणाले,वेत्ते,इन्सुली येथे परप्रांतीयाकडून केल्या जाणाऱ्या उत्खननास संबंधित दोन अधिकारीच जबाबदार आहेत.या उपसामुळे येथील स्थानिक शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत आहे.जर कोणी घरासाठी माती काढली तर प्रांत व तहसीलदार जाऊन कारवाई करतात,मग यांच्यावर कारवाई का केली जात नाही?असाही सवाल त्यांनी यावेळी केला. या बेकायदा खाणीमागे महसूल अधिकारीच आहेत.त्यामुळे येत्या दोन दिवसात याबाबतची माहिती अधिकाऱ्यांनी न दिल्यास भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालयावर मोर्चा काढू,असाही इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.