उत्सव साधेपणाने होणार; महाप्रसाद, सांस्कृतिक कार्यक्रम रद्द…
कणकवली, ता.१४ ः येथील भालचंद्र महाराजांचा ११७ वा जन्मोत्सव सोहळा ३० जानेवारी ते बुधवार ३ फेब्रुवारी २०२१ या पाच दिवसांच्या कालावधीत साजरा होणार आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शासकीय नियम पाळून अत्यंत साधेपणाने हा जन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे. या सोहळ्यात सर्व धार्मिक विधी होणार आहेत, मात्र महाप्रसाद व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याची माहिती आज भालचंद्र महाराज संस्थानतर्फे देण्यात आली.
जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत पहाटे समाधीपूजन, काकड आरती तसेच परमहंस भालचंद्र मन्युसुक्त याग हा धार्मिक विधी होणार आहे. दुपारी बाबांची महाआरती, सायंकाळी भजने, धुपारती, तर रात्री आठ वाजता बाबांची दैनंदिन आरती होणार आहे.
दरम्यान ३० जानेवारीला सत्यनारायण महापूजा तर २ फेब्रुवारीला सकाळी ९ ते १२.३० यावेळेत रक्तदान शिबिर होणार आहे. ज्या भाविकांना या शिबिरात सहभागी व्हायचे असेल त्यांनी संस्थानकडे आगामी नावनोंदणी करावयाची आहे. भालचंद्र महाराज यांचा ११७ वा जन्मदिन सोहळा ३ फेब्रुवारीला होणार आहे. यात दिवसभरात धार्मिक कार्यक्रम, जन्मोत्सव कीर्तन आणि सायंकाळी ५ वाजता संस्थान परिसरात भाविकांच्या मर्यादित उपस्थितीत पालखी मिरवणूक होणार आहे.