संबंधित अधिकाऱ्यांचे लेखी आश्वासन; संतोष नानचे यांच्यासह ग्रामस्थ झाले होते सहभागी…
दोडामार्ग ता.०६: येथील धाटवाडी कालव्याच्या दुरवस्थेबाबत माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी सुरु केलेले आंदोलन अखेर अधिकार्यांच्या लेखी आश्वासनाअंती मागे घेण्यात आले.यावेळी कार्यकारी अभियंता बी.व्ही.आजगेकर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन १२ फेब्रुवारी पासून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात येईल,तर पंधरा दिवसात हे काम पूर्ण होईल,दरम्यान जोपर्यंत कालवा दुरुस्त होत नाही.तोपर्यंत कालव्यातून १ ते १.५ फुट पाणी सुरु राहिल,असे लेखी आश्वासन दिले.
दोडामार्ग-धाटवाडी येथील कालवा ढासळल्याने आज माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी कालव्यात उतरत अनोखे आंदोलन सुरू केले होते.दरम्यान जोपर्यंत पाहणी होऊन कामास सुरुवात होत नाही,तोपर्यंत पाणी सोडण्यास देणार नाही,असा आक्रमक पवित्रा श्री.नानचे यांच्यासह ग्रामस्थांनी घेतल्यानंतर कार्यकारी अभियंता बी.व्ही.आजगेकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली.यावेळी कालव्याचे बांधकाम ढासळलेले, तसेच अस्तरीकरण खराब,लोंखडी पादचारी पुल खराब झाल्याचे मान्य करत १२ फेब्रुवारीला यंत्रसामग्री आणुन कालव्याची साफसफाई करुन १५ दिवसात कालव्याची दुरुस्ती करू,असे आश्वासन दिले.
यावेळी माजी नगरसेविका हर्षदा खरवत, बाबु खरवत, चंद्रकांत खडपकर, रामा गवस, दिनकर उगवेकर, ननंद नाईक, आनंद ताटे, संजय गवस, नंदू परीट, धीरज नानचे उपस्थित होते.