दिलीप गिरप ; बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात संगणक हस्तांतरण कार्यक्रम…
वेंगुर्ला,ता.०८: संगणक लॅबचा विद्यार्थ्यांनी पुरेपुर उपयोग करून प्राविण्य मिळवावे. तसेच भविष्यात महाविद्यालया साठी आदर्श समोर ठेवून योगदान द्यावे, असे आवाहन वेंगुर्ले नगरपरिषदेचे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी केले.
वेंगुर्ले येथील बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलन ग्रुप विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाला संगणक संच आज हस्तांतरीत केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष श्री. गिरप यांच्या हस्ते फित कापून झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी या विद्यार्थी बॅचचे अध्यक्ष श्री. विजय मोंडकर यांनी महाविद्यालयाप्रति ऋण व्यक्त केले व महाविद्यालयाला मदत करण्याची संधी मिळाली याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. माजी विद्यार्थी श्रीनिवास नाईक यांनी जीवनात मित्रांचे स्थान फार महत्वाचे आहे. आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा प्रभाव आपल्या व्यक्तिमत्वावर पडत असतो. त्यामुळे चांगले मित्र लाभणे हे आपले भाग्य असते असे मत व्यक्त केले. सौ. निता गोवेकर यांनी आपल्या जीवनात कुणाला तरी मदतीचा हात द्यावा आणि एका होतकरु विद्यार्थ्यांनीला मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी श्री. वासुदेव राऊळ आणि श्री. उदय परव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विलास देऊलकर यांनी या बॅचच्या दातृत्वाचा विशेष उल्लेख करुन संगणक लॅब उपलब्ध करुन दिली याबद्दल गौरवपूर्ण उल्लेख केला व महाविद्यालयाला असेच सहकार्य करावे असे आवाहन केले. वेंगुर्ल्याचे सुपुत्र आणि प्रसिध्द डॉक्टर नंदन सामंत यांना श्रध्दांजली वाहून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी श्री. अरविंद सावंत, श्री. उमाकांत आरावंदेकर, श्री. अरुण पेठे. सौ. सुनिला देसाई, श्री. भाई सावंत, श्री. दिलीप गावडे, श्री. सुभाष तोटकेकर, श्री. श्रीपाद तुळसकर, श्री.. अशोक तोरसकर, सौ. स्नेहा नाईक, श्री. सुनिल धाग इत्यादी माजी विद्यार्थी उपस्थित होते. या संगणक लॅबसाठी श्री. सुनील सौदागर, श्री. दिपक सामंत या माजी विद्यार्थ्याचेही सहकार्य लाभले.या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बी.एम. भैरट प्रास्ताविक प्रा. एम. आर. नवत्रे, माजी विद्यार्थ्यांची ओळख प्रा.डॉ आनंद बांदेकर यांनी केली तर आभार प्रा. वामन गावडे यांनी मानले.