गुरुदास गवंडे; तहसीलदार व पोलिस प्रशासनाकडे मागणी…
सावंतवाडी ता.२३: तालुक्यात वास्तव्यास असलेल्या परप्रांतीय कामगारांच्या तात्काळ नोंदी करा, अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष तथा निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी तहसीलदार व पोलीस प्रशासनाकडे केली आहे. याबाबतचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत, मात्र तालुक्यात त्याची अंमलबजावणी होत नाही अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली. यासंदर्भात श्री. गवंडे यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.
त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, केंद्र सरकारने अधिकृत राज्यातील अधिसूचनेद्वारे आंतरराज्य स्थलांतरित कामगार( रोजगार नियमन आणि सेवेच्या अटी) अधिनियम १९७९ हा कायदा लागू केला आहे. परंतु या कायद्याची अंबलबजावणी सावंतवाडी तालुक्यात होताना दिसत नाही. तालुक्यात विविध क्षेत्रात परप्रांतीय लोक काम करत आहेत. परप्रांतीय लोक अनधिकृतपणे राहत आहेत. स्थलांतरित कामगार कायद्याप्रमाणे त्याची नोंद होत नाही. संबंधित बाब गंभीर स्वरूपाची असून तालुक्यात या परप्रांतीय कडून येणाऱ्या काळात गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडू शकतात. तर बांदा व रोणपाल या ठिकाणी या एक दोन वर्षात परप्रांतियांना कडून खून दरोडा यासारखे गुन्हे घडले आहेत. याची गंभीर दखल घेऊन परप्रांतीय कामगारांच्या नोंदणी करावी,अशी मागणी केली आहे.