दोन वर्षानंतर निघाली पायी वारी ; टाळ, मृदूंगाच्या गजरात विठ्ठलाचा जयघोष…!
कणकवली, ता.२९ : सिंधुदुर्गातील वारकरी बांधवांची माघवारी पायी दिंडीचे आज कणकवली शहरातून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले. पुढील बारा दिवसांत ही दिंडी पंढरपूरला पोचणार आहे. शहरातील भालचंद्र आश्रमात रिंगण सोहळा झाल्यानंतर पायी दिंडीचे प्रस्थान झाले.
गेली दोन वर्षे कोरोनामुळे वारीच्या आंनदीसोहळ्याला ब्रेक लागता होता. यंदा मात्र दोनशेहून अधिक भाविकांनी पायी वारीत सहभाग घेतला आहे. सकाळी आणि सायंकाळच्या सत्रात पायीवारी आणि रात्री ठिकठिकाणी मुक्काम करत पायी दिंडी माघवारीला पंढरपूरला पोचणार आहे.
पंढरपूर वारीसाठी काल (ता.२८) सायंकाळपासूनच जिल्ह्यातील भाविक कणकवलीत एकत्र आले होते. आज सकाळी भालचंद्र महाराज आश्रमात वारकऱ्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर भालचंद्र आश्रम आणि कणकवली पटवर्धन चौकात रिंगण सोहळा झाला आणि पायी दिंडी वारीचे प्रस्थान झाले. विठुनामाचा जयघोष करत सुरू असलेला हा रिंगणसोहळा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी केली होती. या पायी वारीत , ह.भ.प.गवंडळकर ह.प.भ.गायकवाड , ह.भ.प.मडवी, हर्षल अंधारी यांच्यासह वारकरी सहभागी झाले आहेत.