शिवसेनेची मागणी ; आगार प्रमुखांना निवेदन…
कणकवली,ता.२९: एस.टी.चा संप मिटल्यानंतर बहुतांश सर्वच मार्गावरील एस.टी. फेऱ्या सुरू झाल्या आहेत. मात्र कणकवली दारिस्ते ही बस फेरी अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे दारिस्ते गावातील प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे ही बसफेरी तातडीने पूवर्वत करा अशी मागणी आज शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली.
कणकवली युवासेनेचे ॲड.हर्षद गावडे, उत्तम लोके, लवू पवार, बंड्या सावंत आदींनी आज आगार प्रमुख प्रमोद यादव यांची भेट घेतली. यावेळी दारिस्ते गावात एस.टी. बस फेरी सुरू न झाल्याने नागरिकांना जादा तिकीट देऊन कणकवली पर्यंत यावे लागत असल्याची बाब शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मांडली.
सध्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून मान्सूनपूर्वी खरेदी केली जात आहे. याखेरीज खते, बियाणे व इतर शेती उपकरणासांठी शेतकऱ्यांना शहरात यावे लागत आहे. मात्र गावात येणाऱ्या एस.टी. फेऱ्या सुरू न झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे दारिस्ते बसफेरी तातडीने सुरू करा अशी मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली. तर पुढील आठवड्यापासून दिवसातून दोन एस.टी. फेऱ्या दारिस्ते गावासाठी सुरू करण्याची ग्वाही आगार प्रमुख प्रमोद यादव यांनी दिली.