अनिल हळदिवे ; आजी माजी खेळाडूंनी निषेध करण्याचे आवाहन…
कणकवली,ता.०९: सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक कबड्डीपटूंनी जिल्ह्याचे नाव अजरामर केले. यामुळे जिल्हा, राज्य व देशपातळीवर आपला ठसा उमटविला आहे. अशा खेळाडूंवर पूर्वी व
आताही अन्याय होत आहे. याला जिल्हा कार्यकारिणी मधील कार्यवाह दिनेश चव्हाण जबाबदार आहेत. चूकीच्या कार्यपद्धतीला सर्वांनी विरोध करावा असे आवाहन ज्येष्ठ कबड्डीपटू अनिल हळदिवे यांनी केले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री. हळदिवे म्हणतात, वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी १९८३ साली सिंधुदुर्ग जिल्हा फेडरेशनची स्थापना केली. आपल्या जिल्ह्यातील खेळाडूंना राज्यामध्ये खेळाच्या माध्यमातून एक व्यासपीठ मिळवून दिले. त्या अण्णा केसरकर यांना मयत दाखवून त्यांना कार्यकारिणीतून वगळण्यात आले. ज्या अण्णा केसरकर यांनी आपल्या आयुष्याची ५० वर्षे समाजकारण, राजकारण या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मार्गदर्शक ठरले. अशा अण्णांवर जर अशाप्रकारे अन्याय होत असेल तर जिल्ह्यातील आयोजक, पंच, खेळाडू अशा लोकांचे काय होत असेल. हा अन्याय या लोकांनी काय म्हणून सहन करायचा? आता ज्याप्रकारे माहितीच्या अधिकारात ही गोष्ट उघड झाली, त्यावर कायदेशीर कारवाई होईलच. तरी सर्व आजी, माजी आयोजक, खेळाडूंनी अशा गोष्टींचा जाहीर निषेध करावा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व खेळाडूच्या व आयोजकांच्या ठाम पाठीशी उभे रहावे, असे आवाहनही श्री. हळदीवे यांनी केले आहे.