आशिष सुभेदार; अवजड वाहतूक बंद असताना सोडणार्यांवर कारवाई करा, मनसेची मागणी…
सावंतवाडी,ता.२५: आंबोली येथे दुचाकी अपघात झालेल्या युवकाचा मृत्यू हा पोलिस यंत्रणेतील भष्ट्राचाराचा बळी आहे, असा आरोप मनसेचे शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांनी केला आहे. दरम्यान घाटातून अवजड वाहतूक बंद असताना मालवाहू ट्रक घाटातून गेलेच कसा? सवाल त्यांनी केला असून कर्तव्यात कसूर करणार्या त्या पोलिस कर्मचार्यांवर कारवाई त्यांनी मागणी केली आहे. आंबोली घाटात नानापाणी वळणावर झालेल्या दुचाकी अपघातात ट्रक खाली चिरडल्याने कुडाळ वेताळ-बांबर्डे येथील तरुण जागीच ठार झाला होता. या पार्श्वभूमीवर श्री. सुभेदार यांनी आपली भुमिका मांडली आहे. याबाबत त्यांनी प्रसिध्दीपत्रक दिले आहे.
यात असे नमुद केले आहे की, आंबोली घाटात अवजड वाहतूक बंद होती. मग त्या ठिकाणी हा ट्रक गेलाच कसा? त्या मागे नेमका कोण? त्याची चौकशी करुन दोषींवर निलंबनाची कारवाई होणे गरजेचे आहे. अन्यथा मनसे आंदोलन छेडेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.