समीर नलावडे ; टोलच्या कंत्राट मागे जिल्ह्यातील कोणाची नावे…?
कणकवली,ता.२७: जिल्ह्यातील वाहनांना टोल माफी ची मागणी होत असताना जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधी गप्प आहेत. त्यामुळे टोलवसुली संदर्भात या गप्प बसलेल्या लोकप्रतिनिधींची नेमकी भूमिका काय? तसेच या टोल वसुली करिता जरी हैदराबादची एम डी करिमुन्सा ही ठेकेदार कंपनी असली तरी टोल वसुली कंपनीच्या मागे जिल्ह्यातील कोणाची नावे आहेत. ते देखील समोर येण्याची गरज असल्याची मागणी कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केली आहे.
ओसरगाव या टोल नाक्याच्या अलीकडील भागात असलेल्या कणकवली तालुक्यातील खारेपाटण, तरळे पासून च्या लोकांना यामुळे त्रास सहन करावा लागणार आहे. कारण जिल्हा मुख्यालय, जिल्हा न्यायालय, जिल्हा रुग्णालय यासह जिल्ह्यातील प्रमुख कार्यालये व महत्त्वाच्या कामासाठी नागरिकांना वारंवार जिल्हा मुख्यालयी ओरोस येथे जावे लागते. त्यामुळे या टोल नाक्याच्या वसुलीमुळे या जनतेला मनस्ताप सहन करावा लागणार आहे. असेही श्री नलावडे यांनी सांगितले. त्यामुळे जिल्ह्यातील कुणाचा या टोल वसुली मध्ये सहभाग आहे काय? व सहभाग असल्यास जिल्ह्यातील जनतेसमोर पडद्यामागील लोक येतील काय? या टोल ठेकेदार कंपनी च्या मागे खरे नाव कोणाचे असा देखील सवाल नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी उपस्थित केला.