नारायण राणेंचा दावा; आपल्या यशात केसरकरांचा एक नंबर वाटा…
रत्नागिरी,ता.०४: कोकणात कमळ फुलले त्याचा मला आनंद आहे. आता गोड-गोड वाटतय असे सांगत, “अब की बार मेरी बारी” आता विरोधकांचे नामोनिशाण ठेवणार नाही, अशी प्रतिक्रीया नवनियुक्त खासदार नारायण राणे यांनी आज येथे दिली. दरम्यान आपल्याला निवडणून आणण्यासाठी मंत्री दिपक केसरकर यांचा एक नंबरचा वाटा आहे. मंत्री उदय सामंत यांनी ही चांगले काम केले असे सांगून नितेश, निलेशसह कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे मेहनत घेतल्यामुळे मी विजयी झालो असे त्यांनी सांगितले.
श्री. राणे हे विजयी झाल्यानंतर त्यांनी उपस्थित माध्यमांना प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले, राज्यात आणि देशात भाजपाला मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे. त्यामुळे आता गोड-गोड वाटत आहे. येणार्या काळात या ठिकाणी विकासासाठी प्रयत्न केले जाणार आहे. माझा विजय हा सर्वसामांन्य कार्यकर्त्यांचा विजय आहे. मंत्री केसरकर यांच्यासह उदय सामंत यांनी प्रामाणिकपणे काम केल्यामुळे मला यश मिळाले आहे. त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. श्री. राणे म्हणाले, ज्या ठिकाणी विरोधकांची ताकद असते त्या ठिकाणी जावून काही तरी नाविन्यपुर्ण करायचे ही राणेंची स्टाईल आहे, आणि त्या मुळे मी या जनतेच्या प्रेमाने निवडून आलो आहे. जिथे कोकण तिथे विजय असे सांगून त्यांनी आता सर्वांना घेवून आपण विकास करुया असे आवाहन केले.