नितेश राणे; राणेंच्या विजयात ठाकरे पक्षातील अदृश्य हातांची साथ…
कणकवली,ता.०५: या निवडणुकीत काही कटू अनुभव आले. काही ठिकाणी महायुती धर्माचे पालन झालेले नाही. याबाबत मी महायुतीच्या व्यासपिठावर बोलणार आणि हिशोबही व्याजासकट चुकता करणार असा इशारा आमदार नितेश राणे यांनी आज दिला. तर शिवसेना ठाकरे पक्षातील अदृश्य हात, बाळासाहेबांचे जुने शिवसैनिक आणि महायुतीमधील घटक पक्षांच्या मदतीमुळे राणेंच्या विजयाचा मार्ग सुकर झाला असेही ते म्हणाले. या निवडणुकीत मॅन ऑफ द मॅच हे दीपक केसरकर असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
येथील प्रहार भवनमध्ये आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत महायुतीचे भाजपचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना आपल्या हक्काचा व मोदींच्या विचारांचा खासदार म्हणून कोकणी जनतेने निवडून देत लोकसभेत पाठवल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. लोकसभेच्या निवडणुकीतील निकालानंतर कोकणाच्या विकासाच्या आड येणाऱ्या शिवसेना उबाठा गटाला कोकणी जनतेने राजकीयदृष्ट्या हद्दपार केले आहे. या निवडणुकीत शिवसेना उबाठा गटातील अदृश्य शक्ती, जुने शिवसैनिक, महायुतीच्या घटक पक्षांनी नारायण राणे यांना केलेल्या मदतीमुळे राणेंच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. या निवडणुकीत काही कटु अनुभव आले, तर काही ठिकाणी महायुतीच्या धर्माचे पालन झालेले नाही, याबाबत महायुतीच्या व्यासपीठावर मी बोलणार आणि हिशोबही व्याज सहित चुकता करणार आहे
राणे म्हणाले, या मतदारसंघाचे गेली १० वर्षे शिवसेना उबाठा गटाचे खासदार विनायक राऊत नेतृत्व करीत होते. मात्र त्यांनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी काहीच काम केले नाही. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी निष्क्रिय खासदार विनायक राऊत यांचा पराभव करून नारायण राणे यांना विजयी करून लोकसभेत पाठवले. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी व रोजगारनिर्मिती साठी नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून आपण प्रयत्न करणार आहोत. कोकणाच्या विकासासाठी आवश्यक असलेले सी-वर्ल्ड, ग्रीन रिफायनरी प्रकल्प पुन्हा आणण्यासाठी आग्रही असल्याचे राणे म्हणाले.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर संजय राऊत हे देशात एनडीएचे सरकार येणार नाही, असे सांगत आहेत. मात्र, देशात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार येणार आहे. त्यामुळे राऊतांनी बोलताना तारतम्य बाळगावे, असा टोला राणेंनी लगावला. राज्यातील २१ मतदारसंघातून शिवसेना उबाठा गटाने निवडणूक लढवली होती. त्यापैकी ९ खासदार निवडून आले आहेत. हे सर्व खासदार काँग्रेसच्या पाठबळामुळे निवडून आले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मातोश्री सोडून १० जनपथसमोर वाचमन म्हणून काम करावे, अशी टीका राणेंनी केली.
दक्षिण मुंबई मतदारसंघातून शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार अरविंद सावंत हे खासदार म्हणून निवडून आले आहेत. मात्र, युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातून त्यांना केवळ ५ हजारचे लीड मिळाले आहे. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून आदित्य ठाकरे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी राऊतांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे करावी, असा टोला राणेंना लगावला.
नारायण राणे यांना यांच्या प्रचारासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कणकवलीत सभा घेतली होती. या सभेचा राणेंना फायदा झाला. तर विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांनी कणकवली सभा घेतली. या सभेत त्यांनी राणे कुटुंबियांना व भाजपच्या नेत्यांना शिव्या दिल्या होत्या. उद्धव ठाकरे यांची कृती कोकणी जनतेला आवडली नसल्याने त्यांनी मतपेटीतून उत्तर देऊन राऊतांचा पराभव करीत नारायण राणेंना विजयी केले. माझ्या कणकवली मतदारसंघातून राणेंना ४२ हजार मतांचे माताधिक्य केले, असे त्यांनी सांगितले. राणेंच्या विजयात पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय
शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासह महायुतीतील घटक पक्षांचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा असून त्यांचे मी मनापासून आभार मानत आहे. राणेंच्या विजयाचे केसरकर हे मॅन ऑफ दि मॅच असल्याचे राणेंनी सांगितले. किरण सामंत यांच्याबद्दल विरोधकांकडून गैरसमज पसरविले गेले होते. मात्र, त्यांनी राणेंच्या विजयासाठी काम केले आहे. निवडणुकीच्या काळात किरण सामंत हे माझ्या व नीलेश राणे यांच्या कायमच संपर्कात होते, असे राणेंनी सांगितले.