जयेंद्र परुळेकरांची खंत; नवख्या खासदारांना मंत्रीपद दिल्याची टीका…
सावंतवाडी,ता.१०: माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री राहिलेल्या नारायण राणे यांना डावलून नरेंद्र मोदी आणि पक्ष नेतृत्वाने राणेंसह अवघ्या कोकणी जनतेचा अपमान केला, अशी टीका शिवसेनेचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परूळेकर यांनी केली आहे. त्या ठिकाणी मोहोळ आणि खडसे यांसारख्या अनुभवाने कमी असलेल्या खासदारांना मंत्रिपद देण्यात आले. मात्र राणेंना त्या ठिकाणी संधी देण्यात आली नाही. याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्र देऊन आपली भूमिका व्यक्त केली आहे. त्यात असे म्हटले आहे की,काल पंतप्रधान मोदी यांचा शपथविधी दिल्ली येथे पार पडला. यावेळी मोदींसोबत भाजप व एनडीएच्या ७२ जणांनी कॅबिनेट आणि राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र या सोहळ्यात सिंधुदुर्ग- रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेचा जाणीवपूर्वक अपमान करण्यात आला आहे. साडेचार लाख मते देऊन येथील जनतेने लोकसभेत पाठवलेल्या माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मंत्रिपद नाकारून मोदी आणि त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाने कोकणातील जनतेचा अवमान केलेला आहे.
मोहोळ आणि खडसे सारख्या अनुभवाने कमी असलेल्या खासदारांची वर्णी मात्र मंत्रीपदासाठी माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री राहीलेल्या नारायण राणे यांना डावलून मोदी आणि पक्षनेतृत्वाने राणेंचा आणि येथील जनतेचा अपमानच केलेला आहे, असे ते म्हणाले.