बबन साळगावकर; शासनाकडे निधी उपलब्ध करून देण्याची मागणी…
सावंतवाडी,ता.१२: येथील पालिकेच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या पर्यटन स्वागत केंद्रांच्या इमारतीचे नूतनीकरण केल्याशिवाय त्याची निविदा प्रक्रिया करू नये, अशी मागणी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे. या इमारतीच्या नूतनीकरणासाठी तब्बल ३ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे राज्य शासनाने तो निधी तात्काळ उपलब्ध करून द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
सावंतवाडी पालिकेच्या उद्यानाच्या बाजूला असलेले पर्यटन स्वागत केंद्र एमटीडीसीच्या माध्यमातून उभारण्यात आले होते, ते सावंतवाडीतील एका व्यवसायिकाकडून चालवण्यात येत होते. मात्र त्याची मुदत आता संपलेली आहे. त्यामुळे सद्यस्थिती केंद्र बंद आहे. मात्र त्याची निविदा प्रक्रिया काढून हे केंद्र पुन्हा चालवण्यास देण्यासाठी हालचाली सुरू आहेत. याबाबत श्री. साळगावकर यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार या केंद्राची इमारत अतिशय जीर्ण झाली आहे. त्यामुळे पुन्हा निविदा प्रक्रिया काढण्यापूर्वी या इमारतीची दुरुस्ती करण्यात यावी आणि त्यानंतरच त्याची निविदा प्रक्रिया काढून ते पुन्हा सुरू करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.