जीवनात कोणताही व्यवसाय निवडा मात्र त्यामध्ये यशस्वी व्हा…

112
2
Google search engine
Google search engine

सुहास सावंत; मालवणात दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार…

ओरोस,ता.१७: तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन अत्याधुनिक यंत्रणेचा शोध लावला जात आहे. याचा फटका खाजगी नोकऱ्यांवर होणार आहे. त्यामुळे जीवनात कोणताही व्यवसाय निवडा मात्र त्यामध्ये यशस्वी व्हा, असे आवाहन सकल मराठा समाजाचे जिल्हा समन्वयक ॲड. सुहास सावंत यांनी केले. मालवण तालुक्यातील सकल मराठा समाज कट्टा दशक्रोशी संघटनेच्या वतीने मराठा समाजातील दहावी व बारावी परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा वराड हडपीवाडी येथील नम्रता हॉल येथे रविवारी संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून ऍड सावंत बोलत होते.

यावेळी उद्योजक सुभाष काराणे, समाजाचे मालवण तालुका उपाध्यक्ष विनायक परब, कृषी मंडळ अधिकारी धनंजय गावडे, माजी सभापती राजेंद्र परब, मंडळ अध्यक्ष डॉ जी आर सावंत, जयद्रथ परब, विष्णू लाड, वैष्णवी लाड, गोळवण सरपंच सुभाष लाड, उपसरपंच सुमित सावंत, सुशील गावडे, भाई राणे, चाफेखोल माजी सरपंच श्रीमती गावडे, सतीश दळवी, बाबा राणे, स्वप्नील गावडे, वराड सरपंच शलाका रावले, शेखर मसुरकर, भाई परब, वैभव जाधव, मनोज राऊळ, राकेश डगरे, अमित सावंत, समीर रावले, राजा गावडे, आर्या गावडे, मनस्वी गावडे, साक्षी गावडे यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

यावेळी ॲड. सावंत म्हणाले की, समाजाच्या सभोवताली जे काय चालते ते डोळसपणे बघा, अभ्यास केल्यास परीक्षेत गुण मिळतील, परंतु सभोवतालचा अभ्यास न केल्यास आयुष्यात ठेच खावी लागेल. जीवनात अधिकारी, व्यावसायिक अथवा शेतकरी व्हा पण जे काय व्हाल त्यात टॉप व्हा. ए आय तंत्रज्ञान बहुतेक नोकऱ्या काढून घेणार आहे. त्यामुळे याचा अभ्यास करून तुमच्या करिअरची निवड करा. मराठा समाजाने योजनांचा फायदा घ्यायला शिकले पाहिजे, असे विद्यार्थ्यांना आवाहन करीत सारथी संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. तसेच यू पी एस सी, एम पी एस सी, इंजिनियर किंवा अन्य शिक्षण घेताना मिळणाऱ्या लाभाची माहिती दिली.

यावेळी विनायक परब म्हणाले, आयुष्यभर सतत विद्यार्थी बना समाज, निसर्ग आणि सर्व गोष्टींकडे विद्यार्थी म्हणून पाहा. तरच तुम्ही यशस्वी व्हाल. पॉवर असणारे अधिकारी व्हा. जिंकणारच, असा आत्मविश्वास ठेवा, गुणवंत विद्यार्थ्यांना आवाहन केले. तर राजेंद्र परब यांनी, खऱ्या अर्थाने तुमच्या जीवनाला आता महत्व प्राप्त झाले आहे. आताच तुम्हाला निश्चित करायचे आहे. येथे योग्य दिशेची गरज आहे. मनातील भीती काढून टाकावी. बिनधास्त सामोरे जाण्याची तयारी ठेवा. अपयश आले म्हणून घाबरून जायचे नाही. आपली क्षमता ओळखून धेय्य सुरू ठेवायचे आहे. आपण कुठेही कमी नाही, असे ठरवून अभ्यास केला पाहिजे, असे आवाहन केले. सूत्रसंचालन जयंद्रथ परब, वैष्णवी लाड यांनी केले. यावेळी मराठा समाजातील खासदार झाल्याने नारायण राणे यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. कृषी मंडळ अधिकारी धनंजय गावडे यांनी दहावी, बारावी नंतर योग्य करिअर कसे निवडावे ? याबाबत मार्गदर्शन केले.