लाभार्थ्यांमधून तीव्र नाराजी; तात्काळ रक्कम अदा करण्याची मागणी…
सावंतवाडी,ता.२५: तालुक्यातील दिव्यांग बांधवांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत देण्यात येणारी पेन्शन गेले ३ महिने रखडली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांची सही नसल्याच्या शुल्लक कारणामुळे पेन्शन रखडवली आहे, असे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.संजय गांधी निराधार योजनेंतर्गत निराधार, दिव्यांगांना दीड हजार प्रती महिना मानधन देण्यात येते. या योजनेची रक्कम गेले ३ महिने खात्यावर जमा झाली नसल्याची तक्रार अनेक लाभार्थी करत आहेत. या पेन्शन योजनेबाबत अनेक तक्रारी असून, लोकप्रतिनिधी मात्र याकडे दुर्लक्ष करत आहेत असे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे.
याबाबत सावंतवाडी तहसीलदार कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, या योजनेचे अनुदान मे महिन्यात जमा झाले आहे, मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांची सही न झाल्यामुळे ते खात्यावर जमा करण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले. तसेच या योजनेचे अनुदान यापुढे ऑनलाईन पद्धतीने जमा होणार असून, त्याची चाचपणी सुरू असल्याने पेन्शन योजनेची रक्कम जमा होण्यास वेळ लागत असल्याचे कारण पुढे करण्यात येत आहे. असे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे.