बाबी जोगी; जीवितहानी झाल्यास पालिका अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसू देणार नाही…
मालवण, ता. २७ : शहरातील बाजारपेठेतील भाजी मंडईच्या जुन्या इमारतीची पडदी मुसळधार पावसात कोसळण्याची भीती असून भाजी विक्रेत्यांसह, ग्राहकांच्या जीवीतास धोका निर्माण झाला आहे. यामुळे पालिका प्रशासनाने तात्काळ ही इमारत पाडण्याची कार्यवाही करावी. जर पडदी कोसळून जीवितहानी घडल्यास पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसू देणार नाही असा इशारा उबाठा गटाचे शहरप्रमुख बाबी जोगी यांनी पत्रकातून दिला आहे.
बाजारपेठेतील पालिकेच्या मालकीची भाजी मंडईची इमारत आहे. यात नवीन इमारतीसाठी काही भाग तोडण्यात आला. मात्र उर्वरित इमारत तशीच ठेवण्यात आली आहे. यात बाल्कनीतील पडदी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत ही पडदी दोरीने बांधून ठेवण्यात आली आहे. या प्रकाराची माहिती मिळताच उबाठा गटाचे शहरप्रमुख बाबी जोगी, सन्मेष परब, मंदार ओरसकर, किरण वाळके, करण खडपे, सिद्धेश आचरेकर या पदाधिकाऱ्यांनी भेट देत पाहणी केली.
या इमारतीच्या खाली भाजी विक्रेते बसतात. त्यामुळे मुसळधार पावसात जर ही पडदी कोसळल्यास जीवितहानी घडण्याची शक्यता आहे. याची माहिती असूनही पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. पालिका प्रशासन जीवितहानी घडण्याची वाट पाहत आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पालिका प्रशासनाने जर याची गांभीर्याने दखल घेत आवश्यक कार्यवाही न केल्यास आणि याठिकाणी जीवितहानी घडल्यास पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना खुर्चीत बसू देणार नाही असा इशारा श्री. जोगी यांनी दिला.