अरूण दुधवडकरांचा सवाल; आमदार गेले म्हणून शिवसेना संपणार नाही…
कणकवली,ता.२४: सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी आत्तापर्यंत नारायण राणे यांच्या विरोधात संघर्ष केला आहे. मात्र ज्यांच्याशी संघर्ष केला, त्यांच्याच मांडीला मांडी लावून तुम्ही कसे बसणार असा प्रश्न श्री.केसरकर यांना मी निश्चितपणे विचारणार असल्याचे शिवसेना संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर यांनी स्पष्ट केले.
श्री.दुधवडकर म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुखांनी शिवसेनेच्या कुठल्याही आमदारा अडवलेले नाही. ज्यांना कुणाला कुठे जायचे असेल त्यांनी जावे असे श्री.ठाकरे यांनी जाहीर केले होते. त्यामुळे कालपर्यंत मातोश्रीवर असणारे दीपक केसरकर हे एकनाथ शिंदे यांच्या पर्यंत जाऊ शकले. पुढील एक दोन दिवसांत केसरकर हे मुंबईत येणार आहेत. त्यावेळी मी त्यांना राणेंबाबत निश्चितपणे प्रश्न विचारणार आहे. केसरकर यांनी आज पर्यंत राणेंच्या विरोधात संघर्ष केला. मात्र आता त्यांच्या सोबत मांडीला मांडी लावू कसे बसणार याचेही उत्तर केसरकर यांच्याकडून घेणार असल्याचे श्री.दुधवडकर म्हणाले.
आजवर अनेक आमदारांनी शिवसेना सोडली आहे. पण शिवसेना कधीही संपलेली नाही. आमदारांना शिवसेना निवडून देत असते आणि संपूर्ण शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरेंसोबत आहे. त्यामुळे आमदार गेले म्हणून शिवसेना संपणार नाही तर आमदारांचेच राजकीय अस्तित्व संपेल असेही श्री.दुधवडकर म्हणाले.