सर्वांन विश्वासात घेवून योजना राबविणार;संजय आईरांसह तीस सदस्यांनी दिलेला इशारा…
बांदा,ता.१०: वाफोली येथे जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर असलेल्या पूरक नळ पाणी योजना संदर्भात येथील सामाजिक कार्यकर्ते व तक्रारदार संजय आईर व विद्यमान तीन ग्रामपंचायत सदस्य यांनी पुकारलेले उपोषण मागे घेतले.
विश्वासात न घेता योजनेचे काम केवळ चार लोकांना घेऊन भूमीपूजन केल्याने मासिक सभेत सदस्यांनी जाब विचारला तेव्हा खडाजंगी होऊन वाद निर्माण झाला होता. सामाजिक कार्यकर्ते संजय आईर यांनी योजनेसाठी हस्तातर केलेल्या जागेचा सर्वे करून गाव दप्तरी रेकॉर्डला सातबारा सदरी नोंद करवून घेण्याबाबत ग्रामपंचायती कडे अर्ज दाखल केलेला होता. तशी मासिक व ग्रामसभेत चर्चा करून ठराव करून घेण्यात आलेला होता. परंतु ग्रामपंचायतीने काहीच कारवाई न करता जागेचा सर्वे न करता व सर्वे करण्याबाबत काही अडचणी होत्या तर ग्रामपंचायत सदस्य व अर्जदार यांना विश्वासात घेऊन यांच्या बरोबर चर्चा करूनच त्या नंतर योजनेचे काम सुरु केले पाहिजे होते ही विरोधी सदस्य यांची मागणी होती. यावरून वाद निर्माण झाल्याने संजय आईर व तीन ग्रामपंचायत सदस्य यांनी आज रोजी बेमुदत उपोषण करण्याचे ठरविले होते.
त्या अनुषंगाने सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, संजय आईर, वाफोली तंटामुक्ती अध्यक्ष, वाफोली पोलीस पाटील यांची संयुक्त बैठक ग्रामपंचायत येथे घेण्यात आली. योजनेच्या वादग्रस्त वेगवेगळ्या विषयावर विस्तृत चर्चा करण्यात आली. सर्वाना विश्वासात घेऊन योजना मार्गी लावण्यावर एकमत झाले या पुढे सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन चर्चा करून पुढे पाऊल टाकू असे ग्रामपंचायती कडून सांगण्यात आल्याने उपोषण मागे घेण्यात आले.