राजकोट येथील छत्रपतींच्या पुतळ्याचे ४ डिसेंबरला अनावरण…

3
2
Google search engine
Google search engine

पंतप्रधानांची प्रमुख उपस्थिती; न भूतो न भविष्यती असा सोहळा होणार, प्रमोद जठार…

मालवण, ता. १४ : छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतःच्या हाताने किल्ले सिंधुदुर्गची मुहूर्तमेढ मालवण किनारपट्टीवर रोवली. किल्ले सिंधुदुर्ग व अन्य गडकोट उभारणी करून सगळ्या समुद्री आक्रमणाना रोखले. ‘फादर ऑफ इंडीयन नेवी’ म्हणूनही छत्रपतींचा गौरव होतो. अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येथील किनारपट्टीवर किल्ले राजकोट येथे उभारणी होत आहे. ४ डिसेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. ‘न भूतो न भविष्यति’ असा हा सोहळा ठरणार आहे. असे माजी आमदार प्रमोद जठार यांनी येथे स्पष्ट केले.
४ डिसेंबर रोजी किल्ले सिंधुदुर्ग परिसरात तसेच मालवण किनारपट्टीवर साजरा होणाऱ्या नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणी होत आहे. या कामाची पाहणी माजी आमदार प्रमोद जठार, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आज केली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, गणेश कुशे, पर्यटन महासंघ अध्यक्ष बाबा मोंडकर, महेश मांजरेकर, बबन रेडकर, जॉन नरोना, युवामोर्चा शहराध्यक्ष ललित चव्हाण, नारायण धुरी, नंदू देसाई यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
पुतळा उभारणी कामाची चांगली प्रगती आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण, जेष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यासह सर्वांच्या मार्गदर्शनाखाली याठिकाणी हा उत्सव ४ डिसेंबरला होणार आहे. न भूतो न भविष्यती असा हा कार्यक्रम सोहळा असणार आहे.
आमचे छत्रपती शिवाजी महाराज यांनी हल्ला करणाऱ्या परप्रांतीय आक्रमणला परतवून लावले. सनातन धर्म हिंदू धर्म टिकवणे कार्य ज्या आमच्या राजाने केले त्यांच्यासमोर नतमस्तक होण्यासाठी आम्ही सर्वजण ४ डिसेंबरला येणार आहोत. महाराष्ट्र, कोकण वाजत गाजत याठिकाणी येणार आहे. कोकणातील गडकिल्ले येथील माती कलश माध्यमातून वाजत गाजत याठिकाणी आणणार आहे. असेही श्री. जठार यांनी सांगितले.
भारतीय नेव्ही, सार्वजनिक बांधकाम विभाग गतिमान व चांगल्या पद्धतीने काम करत आहे. आमचे सर्व सहकारी यांचेही लक्ष असल्याचे जठार यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण या ऐतिहासिक क्षण सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोवा येथून अनेकजण येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही उत्साहात भव्यदिव्य स्वागत होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व करण्याचे सौभाग्य या काळात मला लाभले आहे, याचाही आनंद आहे. या ऐतिहासिक सोहळ्यात नवीन ऊर्जा प्राप्त होईल. असे भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सांगितले.
काही लोकांच्या मनात शंका पसरवाल्या जात आहेत. आठ, पंधरा दिवस दुकाने बंद राहणार अशा अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र असे काही होणार नाही. आवश्यक त्या ठिकाणी सुरक्षा दृष्टीने काही काळजी घेण्याबाबत सूचना दिल्या जातील. मात्र आठ, पंधरा दिवस पूर्णपणे बंद ठेवले जाणार नाही. याबाबत पोलीस अधिक्षक यांच्याशी चर्चा झाली आहे. असे श्री. जठार यांनी सांगितले.
किल्ले राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारणी नंतर त्या ठिकाणी सायंकाळ नंतर लेझर शो होण्यासाठी आपले प्रयत्न राहतील. दर दिवशी सायंकाळी-रात्री या लेझर शो माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास पर्यटक यांना उलघडून सांगितला जाईल. रत्नसिंधु योजनेतून यासाठी ५ कोटी निधी उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न राहणार असल्याचे माजी आमदार श्री. जठार यांनी सांगितले.