दांडीत बांधण्यात येणारा “तो” बंधारा मच्छीमारांना अडचणीचा ठरणार..

38
2
Google search engine
Google search engine

विजय केनवडेकर; श्रेयासाठी वैभव नाईक यांनी खुशाल नारळ फोडावेत…

मालवण, ता. ५ : शहरातील दांडी बंधाऱ्याच्या पहिल्या टप्याच्या बंधाऱ्याचा आमदार वैभव नाईक यांनी श्रेयवादासाठी नारळ फोडला खरा मात्र ते संपूर्ण काम हे स्थानिक मच्छीमारांना त्रासदायक ठरणार आहे. हा बंधारा केवळ धूपप्रतिबंधक असल्याने मच्छीमारांना आपत्कालीन परिस्थितीत नौका बंधाऱ्याबाहेर काढताना अडचणीचे ठरणार आहे.आमदारांनी स्थानिक मच्छीमारांना विश्वासात घेवून काम सुचविले असते तर ते योग्यप्रकारे आणि स्थानिकांच्या फायद्याचे ठरले असते, अशी टीका भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

दरम्यान याच बंधाऱ्याच्या दुसऱ्या टप्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सहकार्याने पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सुमारे २०० मीटरचा शिल्लक बंधारा मंजुर करताना तो स्थानिक मच्छीमारांची मते विचारात घेऊन रस्ताकम बंधारा निश्चीत केला आहे. यासाठी माजी खासदार निलेश राणे यांनी पाठपुरावा केला असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आले.

यावेळी सुदेश आचरेकर, पंकज सादये, चारुशीला आचरेकर, ललित चव्हाण, नारायण धुरी, आबा हडकर, कमलाकर कोचरेकर, संदीप मालंडकर, दादा कोचरेकर, भाई मांजरेकर आदी उपस्थित होते.

श्री. केनवडेकर म्हणाले, भाजप नेते निलेश राणे हे कुडाळ मालवण मतदार संघातील विकासकामांसाठी सतत झटत आहेत. यासाठी त्यांनी जिल्हा नियोजन विभागातून उपलब्ध होणाऱ्या निधीबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून गावागावातून परिपूर्ण प्रस्ताव येण्यासाठी प्रयत्न केले आहेत. यामुळे आता मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत आहेत. त्याची कामे गावागावात सुरू आहेत. आमदार वैभव नाईक यांना श्रेय घेण्यासाठी नारळ फोडावे वाटत असतील तर त्यांनी खुशाल फोडावेत. आम्ही जनतेच्या दरबारात जावून जनतेला अभिप्रेत असलेली विकासकामे पूर्ण करून जनतेच्या विश्वास सार्थकी लावू. दांडी बंधाऱ्याचा नारळ फोडताना आमदारांनी स्थानिकांची मते विचारात न घेतल्याने बंधारा झाल्यानंतर त्याचा त्रास मच्छीमारांना होणार आहे.

बंधाऱ्यासाठी ३०० ते ५०० किलो वजनाचा दगड वापरणे गरजेचे असताना कमी वजनाचा दगड वापरला जात आहे. भुमीपूजन झाल्यापासून फक्त सात डंपर दगड टाकण्यात आलेआहेत. हे काम कोण ठेकेदार करतो हे आमच्यासाठी महत्वाचे नाही, तर होत असलेले काम दर्जेदार होण्यासाठी भाजपा लक्ष ठेवून राहणार आहे. बंधाऱ्यासाठी निश्चीत करण्यात आलेल्या वजनाचा दगड वापरण्यात न आल्यास याबाबत पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे तक्रार केली जाईल, असेही श्री. केनवडेकर यांनी स्पष्ट केले. सध्या सुरू असलेल्या कामासाठी १ कोटी १० लाख रूपये मंजूर आहेत. यातून १५० मीटरचा बंधारा होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी १ कोटी ५० लाख रूपये मंजूर असून यातून २०० मीटरचे काम होणार आहे.

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी चिवलाबिच, राजकोट बंधारे जनतेच्या मागणीनुसार साकारले होते. आमदार वैभव नाईक हे दांडी बंधारा मंजूर करण्यासाठी नऊ वर्षे वाट का बघत होते. पहिल्या टप्याचे काम पूर्ण झाले नसतानाही आम्ही दुसऱ्या टप्प्याला मान्यता घेतली आहे. तीही आवघ्या तीन महिन्यात. या संपूर्ण बंधाऱ्यासाठी आवश्यक असणारी सीआरझेडची परवानगी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रयत्नातून मिळाली आहे. आमदारांनी रस्ता कम बंधारा केला नसला तरी त्या बंधाऱ्यावर काँक्रीटीकरण करण्यासाठी भाजप नेते निलेश राणे प्रयत्न करणार आहेत, असेही श्री. केनवडेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.