दीपक केसरकर; अयोध्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा वासियांना आवाहन…
सावंतवाडी,ता.१९: अयोध्या येथील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील प्रत्येक घरात किमान ५ पणत्या पेटवून जिल्हावासियांनी आनंदोत्सव साजरा करावा असे आवाहन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे. २२ जानेवारीला अयोध्या येथे होणाऱ्या श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा निमित्त देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही विविध संघटना तसेच गावागावात धार्मिक उत्सव व अन्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. एकूणच देशभरात दिवाळी साजरी करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. सावंतवाडी शहरातही भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील मोती तलाव विद्युत रोषणाईने झगमगून निघाला आहे. सर्वत्र २२ जानेवारी ची तयारी युद्ध पातळीवर सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्री दीपक केसरकर यांनी जिल्हावासियांना आवाहन करताना प्रत्येक घरात किमान ५ पणत्या पेटवून श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा आनंदोत्सव म्हणून साजरा करावा, असे आवाहन केले आहे.