राजन तेली ; दीपक केसरकरांना आता जनताच योग्य ती जागा दाखवेल…
सावंतवाडी ता.११: दीपक केसरकर दरवेळी भाजपच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना कमी लेखतात ,दुय्यम स्थान देतात. हे लक्षात आल्यामुळे आम्ही कालच्या विज्ञान प्रदर्शनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला ,अशी प्रतिक्रिया भाजप नेते राजन तेली यांनी दिली.
दरम्यान सकाळी साडेआठ वाजता माजगाव धरण प्रकल्पाच्या भूमिपूजन होते. परंतु ११ वाजले तरी त्या ठिकाणी कोणी आले नाही. केसरकारांकडून कायम वेळ पाळली जात नाही. त्यामुळे आम्ही भूमिपूजन केले असे ते म्हणाले. श्री तेली यांनी काल माजगाव धरण आणि सावंतवाडीच्या नळपाणी योजनेचे भूमिपूजन केले होते. या पार्श्वभूमीवर केसरकर यांनी त्यांच्यावर न बोललेले बरे असा त्यांना चिमटा काढला होता. या आरोपावर श्री तेली यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले , मुख्यमंत्र्यांना आमचा कोणताही विरोध नव्हता. परंतु त्या ठिकाणी जे भूमिपूजनाचे कार्यक्रम होते. त्या ठिकाणी केसरकर यांनी भाजपच्या स्थानिक नेतृत्वाला तसेच माजी नगरसेवकांना डावलले होते. दरवेळी त्यांच्याकडून दुय्यम वागणूक दिली जाते. हा प्रकार योग्य नाही. ते कधी वेळ पाळत नाहीत. त्यामुळे आम्ही हे भूमिपूजन करण्याचा निर्णय घेतला. त्याच्याकडून वेळोवेळी स्थानिक कार्यकर्त्यांना डावलण्यात येते. राज्यात भाजपा शिवसेना युतीची सत्ता आहे. असे असताना प्रत्येक कार्यक्रमाला त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना बोलवणे गरजेचे आहे. परंतु तसे होताना दिसत नाही. त्यामुळे त्यांना जनताच आणी भाजप सुद्धा योग्य ती जागा दाखवेल, असे त्यांनी सांगितले.