ऐन पर्यटन हंगामात रॉक गार्डन काळोखात…

120
2
Google search engine
Google search engine

महेश कांदळगावकर; लोकप्रतिनिधींच्या गैर हजेरीत अधिकाऱ्यावर कोण अंकुश ठेवणार…?

मालवण,ता.२०: पर्यटकांच्या खास पसंतीचे ठरणारे येथील पालिकेचे रॉकगार्डन ऐन पर्यटन हंगामात कालच्या दिवशी काळोखात असल्याचे दिसून आले. तेथील तिकीट काउंटरही बंद असल्याने पर्यटकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. रॉकगार्डनच्या देखभाल दुरुस्ती कडे लक्ष देण्यास प्रशासकांना वेळ नसल्यानेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीत अशा अधिकाऱ्यांवर कोण अंकुश ठेवणार असा प्रश्न माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी पत्रकातून उपस्थित केला आहे.

पत्रकात म्हटले आहे की, मागील आठ दहा दिवसापासून मोठ्या प्रमाणात पर्यटक तसेच चाकरमानी शहरात दाखल झाले आहेत. किल्ले सिंधुदुर्ग, स्कुबा, वॉटर स्पोर्ट्स याला पर्यटकांची पसंती आहेच पण त्याच बरोबर शहरात समुद्रकिनारी असलेल्या रॉक गार्डनला पण असंख्य पर्यटक भेट देत आहेत. तसेच शहरातील नागरिक, चाकरमानी यांचीही रॉकगार्डनला पसंती आहे.

लोकप्रतिनिधीनी आपापल्या कालावधीमध्ये या रॉकगार्डनची प्रसिद्धी वाढविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. आमच्या कालावधीमध्ये कोकण पट्ट्यात नाही असा एकमेव म्युझिकल फाउंटन या रॉकगार्डन मध्ये बसविण्यात आला आहे. लहान मुलांसाठी खेळणी, बोटिंगची व्यवस्था करण्यात आली . त्यामुळे याठिकाणी पर्यटकांची पसंती आहेच पण त्याचबरोबर स्थानिकाचीही पसंती आहे. पण याच्या देखभाल दुरुस्तीकडे बघायला सध्या प्रशासकाकडे वेळ नाही. सध्या प्रचंड गर्दी असताना आणि रविवार सारख्या दिवशी याठिकाणी लाईट बंद, म्युझिकल फाउंटन बंद अशी परिस्थिती काल बघायला मिळाली. गार्डन बघायला येणाऱ्या व्यक्ती कडून पाच रुपये प्रवेश फी घेतली जाते. त्यापासून पालिकेला लाखो रुपयाचे उत्पन्न प्राप्त झाले आहे असा तिकीट काउंटरही कालच्या दिवशी बंद ठेवल्याचे दिसून आले. बोटिंग मागील दोन अडीज वर्षे बंद असल्याचे. टॉयलेट व्यवस्था अपुरी पडत असल्याने याठिकाणी आमच्या कालावधीत सुमारे २५ लाख खर्च करुन घेण्यात आलेल्या पाच गाडयापैकी एक गाडी आणून ठेवण्याबाबत दोन वर्षापासून सुचित करूनही कुठलीही कार्यवाही नाही. हे सगळं म्हणजे आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खातंय अशी परिस्थिती झाली आहे.

लोकप्रतिनिधीनी सूचना करूनही शहर विकासाच्या कुठल्याही बाबतीत प्रशासकाची अनास्था आहे. त्यांच्यावर कोणाचाही अंकुश नाही हेच अधोरिखित होत आहे. लोकप्रतिनिधी आपापल्या क्षमतेप्रमाणे आपल्या शहराचा विकास होण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतात पण ज्यांना शहराच्या विकासाचे काही देणे घेणे नसते असा एखादा अधिकारी विकासकामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन जर शहराची वाट लावत असेल तर त्यांच्यावर लोकप्रतिनिधींच्या गैरहजेरीत कोण अंकुश ठेवणार हा एक प्रश्न पडला असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.