अधिकाऱ्यांच्या विरोधात नाराजी; पुरवठा सुरळीत होईपर्यंत माघार नाही…
सावंतवाडी,ता.२४: ओटवणे गाव तब्बल ४ दिवस अंधारात आहे. वारंवार लक्ष वेधून सुद्धा वीज अधिकारी गप्प आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज तब्बल ५ तास वीज अधिकाऱ्यांना धारेवर धरले. जोपर्यंत आमच्या गावातील वीज पुरवठा सुरू होणार नाही तोपर्यंत कार्यालय सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार गेले ४ दिवस गावात वीज पुरवठा खंडित झालेला आहे. अवकाळी पावसात झालेल्या पडझळीमुळे हा प्रकार झाला आहे. मात्र आपल्याकडे कर्मचारी नाहीत तसेच अन्य कारणे सांगून अधिकारी कानावर हात घेत आहे. त्याचा फटका ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज सायंकाळी ४ वाजता वीज अधिकाऱ्यांना घेराव घातला. मात्र अधिकाऱ्यांकडून कोणतीही उत्तरे मिळाले नसल्यामुळे जोपर्यंत आमची वीजपुरवठा सुरू होत नाही तोपर्यंत आम्ही येथून जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यानुसार अद्यापही आंदोलन सुरू आहे. काही झाले तरी आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.