महाविकास आघाडीला राज्यात मिळालेले यश ही बदलाची सुरुवात…

220
2
Google search engine
Google search engine

अर्चना घारे; आगामी काळात कार्यकर्त्यांनी विधानसभेसाठी वाहून घ्यावे…

सावंतवाडी,ता.०५: राज्यात महाविकास आघाडीला मिळालेले यश ही बदलाची सुरुवात आहे. हा विजय आमच्या कार्यकर्त्यांना बळ देणारा ठरेल, असे मत शरद पवार राष्ट्रवादीच्या कोकण महिलाध्यक्षा अर्चना घारे यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात आपल्याला अपेक्षित यश मिळू शकले नसले तरी भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे कोणीही खचून न जाता पुन्हा एकदा स्वतःला आगामी काळात होणाऱ्या विधानसभेसाठी वाहून घ्यावे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. निवडणुकीच्या निकालानंतर सौ. घारे यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, लोकशाहीमध्ये निवडणुकीत हार-जीत होत असते. यात नाराज व्हायचे नाही. संयम सोडायचा नसतो. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये  विनायक राऊत यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिलेल्या सर्व मतदार, महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी, यांचे सौ. घारे यांनी आभार मानले. तसेच विजयी उमेदवार नारायण राणे यांचे देखील अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. महाविकास आघाडीचे महाराष्ट्रातील यश ही बदलाची सुरुवात आहे. महाविकास आघाडीचा विजय आमच्या कार्यकर्त्यांना बळ देणारा आहे. उत्साह वाढवणारा आहे. असे मत व्यक्त करून महाराष्ट्रात विजयी झालेल्या महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांचं त्यांनी यावेळी अभिनंदन केले.

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आपल्याला अपेक्षित यश मिळू शकलं नसलं तरी, भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. कुठलंही अपयश अंतिम नसतं. अपयशानं खचून न जाता नव्या उत्साहानं, उमेदीनं सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा स्वत:ला लोकसेवेला वाहून घ्यावं.

 

 

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महायुतीकडे दिग्गज नेते होते. मागील विधानसभा निवडणुकीतील पहिल्या दोन क्रमांकाचे मतदान घेणारे उमेदवार होते. मागील विधानसभेतील दोन्ही उमेदवाराच्या मतांची बेरीज जवळपास सव्वा लाख होत असताना फक्त ८५ हजार मत महायुतीला घेता आली.

 

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी  श्री. राऊत यांना चांगली साथ दिली‌. राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून या निकालाचं विश्लेषण केलं जाईल. त्यांच्या निष्कर्षाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी कामाला लागतील अशी भावना यावेळी सौ. अर्चना घारे परब यांनी व्यक्त केली.