परशूराम उपरकर : बिले थकल्याने रेशनवरील धान्य पुरवठा बंद….
कणकवली, ता.२४ : देयके थकीत राहिल्याने जिल्ह्यातील रेशनवरील धान्य पुरवठा बंद राहिला आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न सोडविण्यासाठी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. निवडणुका आल्या की पैसे वाटप करून लोकप्रतिनिधी निवडून येतात. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांकडे हे लोकप्रतिनिधी ढुंकूनही पाहत नाहीत अशी टीका माजी आमदार परशूराम उपरकर यांनी आज केली.
येथील आपल्या संपर्क कार्यालयात श्री.उपरकर यांनी पत्रकार परिषद घेतली.
ते म्हणाले, जिल्ह्यातील रेशन दुकानांवर ठणठणाट आहे. तीन महिन्यांची देयके थकल्याने वाहतूकदारांनी धान्य पोच केलेले नाही. यात गोरगरीब जनता धान्यापासून वंचित राहिली आहे. हा प्रश्न सत्ताधाऱ्यांनी सोडवायला हवा. पण प्रत्येक निवडणुकीत ते मतदारांना पैसे वाटत असल्याने त्यांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे.
उपरकर म्हणाले, भूमी अभिलेख कार्यालयातही सर्वसामान्यांची मोठी अडवणूक केली जात आहे. सर्वर डाऊन असल्याचे कारण देत जमीनीची मोजणीच होत नाही. जिल्ह्यातील सर्व प्रशासनात सावळा गोंधळ चालू आहे. कणकवली प्रांत आणि तहसील कार्यालयात विविध दाखले मिळतात. पण सावंतवाडी प्रांत कार्यालयात अनेक विद्यार्थी आणि नागरिक वंचित आहेत. पालकमंत्री, खासदार, आमदार यांचे प्रशासनावर नियंत्रण नसल्याने शासकीय अधिकाऱ्यांची मन मर्जी सुरू आहे.