सतीश सावंत यांनी घेतली नारायण राणे पासून फारकत

134
2
Google search engine
Google search engine

स्वाभिमान पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा; पुढील भूमिका आठ दिवसात ठरवणार

कणकवली ता.३० :

नारायण राणे यांचे खंदे समर्थक आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी आज महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.आपल्या कलमठ येथील निवासस्थानी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली श्री.सावंत म्हणाले,,गेले काही महिने मला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातील महत्त्वाच्या निर्णयात पासून डावलले जात होते.आमदार नितेश राणे यांनी तर तुम्ही माझ्या कणकवली मतदारसंघात ढवळाढवळ करता असाही प्रश्न केला होता.याखेरीज नारायण राणे हे भाजप पक्षात प्रवेश करणार आहेत.पण मला कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष लढण्यास सांगण्यात आले.या सर्व प्रकाराला कंटाळून मी राणेंपासून फारकत घेत आहे.आजच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा राजीनामा दिलेला आहे .माझी पुढील राजकीय भूमिका आठ ते दहा दिवसात निश्चित होईल ,तसेच मला अपेक्षित असलेला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास करण्यासाठी जो पक्ष साथ देईल ,त्या पक्षात आपण निश्चितपणे जाऊ ,अशी ग्वाही देखील सतीश सावंत यांनी दिली.
श्री.सावंत म्हणाले, राणेंनी माझ्यावर कायमच विश्वास दाखवला होता.त्यामुळे गेली २४ वर्ष त्यांना साथ दिली.राणेंच्या पडत्या काळात अनेक शिलेदार त्यांना सोडून गेले,मात्र मी त्यांच्याशी एकनिष्ठ राहिलो होतो.आज राणे सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत.मात्र माझ्या विषयी त्यांच्या मनात गैरसमज झालेले आहेत.किंबहुना काही लोकांनी गैरसमज पसरवून दिलेले आहेत.त्यामुळेच गेले काही महिने माझ्याविषयी उगाचच वावड्या उठवल्या जात आहेत.मी मातोश्रीवर गेलो नसतानाही ते खरे असे म्हणून माझ्या घरी राणेंनी माणूस पाठवला होता.