तहसीलदार पाटणे ; श्रावणबाळ, वृद्धापकाळ योजनेच्या लाभार्थ्यांना दिलासा…
मालवण, ता. ३० : सध्या कोविड-१९ या रोगाच्या प्रसार सर्वत्र होत असल्याने प्रादुर्भावाचा विचार करता वृद्ध लोकांनी घराबाहेर पडणे धोक्याचे असल्याने श्रावणबाळ व वृद्धापकाळ योजना लाभार्थी व अन्य संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना उत्पन्न दाखले सद्यस्थितीत काढणे आवश्यक नाही अशा सूचना तहसीलदार अजय पाटणे यांनी मंडळ अधिकारी, तलाठी यांना दिल्या आहेत. याची सर्व लाभार्थ्यांना माहिती देण्याचेही त्यांनी सांगितले आहे. अशी माहिती संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य गणेश कुडाळकर यांनी दिली.
संजय गांधी निराधार योजनेतील सर्व लाभार्थ्यांकडून दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्यानंतर माहे एप्रिल ते जून या कालावधीत उत्पन्नाचा दाखला घेणे सक्तीचे करण्यात आले होते. मात्र कोरोना महामारीमुळे वृद्ध लाभार्थ्यांना घराबाहेर पडणे जोखमीचे असल्याने त्यांनी उत्पन्न व हयात दाखल्यांसाठी घराबाहेर पडू नये अशा सूचना लाभार्थ्यांना तातडीने द्याव्यात. तसेच आपल्या कार्यक्षेत्रातील महा-ई-सेवा केंद्रचालकांनाही याबाबत सूचना द्याव्यात अशा सूचना श्री. पाटणे यांनी दिल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही योजनेच्या लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.