महिला शिवसेनेची मागणी; जिल्ह्यासह तालुकास्तरीय प्रशासनाला निवेदन…
सिंधुदुर्गनगरी ता.१५: जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता पुन्हा एकदा १४ दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्यात यावा,अशी मागणी शिवसेनेच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.याबाबत निवेदन देण्यात आले असून १७ ते ३० सप्टेंबर या कालावधीत काही सण-उत्सव नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात यावा,अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्षा जानवी सावंत,मंगल ओरसस्कर ,प्रीती देसाई,मनस्वी परब आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दिवसभरातील सक्रिय रुग्ण संख्या १२०२ तर ११८० जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आज ७४ नव्याने बाधित रुग्ण मिळाले आहेत.अजून प्रतिक्षेत अहवाल ५३९ आहेत, त्याचबरोबर विलगीकरणात १३०३७ ही शासकीय आकडेवारी सिद्ध करण्यास पुरेशी आहे. अपुरी सर्व.आरोग्य व्यवस्था आणि आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची ४० ही संख्या ही गांभीर्याने घेण्याची बाब आहे.
जेव्हा एखाद्या घरातील कर्ता पुरुष कोविड पॉझिटिव्ह येतो, आणि गंभीर होतो त्यावेळेस पाहिलं ‘संकटांचं आभाळ’ हे स्त्री वर कोसळतं! घरातील मुलं सासू-सासरे, आणि जर बरं वाईट झालं सर्वच आम्हा स्त्रियांना भोगावे लागते. नोकरी असो व्यवसाय असो वा शेती. अर्थकारणापेक्षा जीव महत्वाचा आहे.जिल्ह्यात सर्वात जास्त लोकसंख्या महिलांची आहे, सर्वात जास्त मतदार महिला आहेत, सर्वात जास्त लोकप्रतिनिधी (फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेत)महिलाच आहेत आणि महिलांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही मागणी करतो की दि:१७/०९/२०२० ते ३०/०९/२०२० या १४ दिवसांच्या कालावधीत (ह्या कालावधीत कोणतेही सण नाहीत त्यामुळे बाजारात मोठी उलाढाल नाही आणि भात कापणी वै.शेती संलग्नित कामे नाहीत, त्यामुळे) संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात कडकडीत ‘जनता कर्फ्यु’ जाहीर करावा. कोविड प्रसाराची साखळी तोडणे आणि अपुऱ्या आरोग्य सुविधांची सुधारणा करून आरोग्य व्यवस्थेचा ताण कमी करणे, आणि गाव पातळीवर कोविड पॉझिटिव्ह रुग्णांच्या व्यवस्थापन करण्यासाठी हा निर्णय घेणे महत्वाचे आहे.तरी ह्या मागणीचा विचार होऊन कडक अंमलबजावणी व्हावी, असे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.