नितेश राणेंची टिका;फडणवीस नेत्यासारखे आले,ठाकरे अभिनेत्या सारखे गेले…
कणकवली,ता.२१: सुरू न झालेल्या चिपी विमानतळावर मुख्यमंत्री तीन तासांच्या “हाॅलिडे” पॅकेजसाठी आले होते. त्यांनी आजच्या दौऱ्यात सिंधुदुर्गवर नव्हे तर अवघ्या कोकणावर अन्याय केला आहे. त्यांचा आजचा दौरा म्हणजे “लिपस्टिक” दौरा होता. त्याचा काही फायदा नाही, असा आरोप आमदार तथा भाजपचे नेते नितेश राणे यांनी केला.
या दौ-यात त्यांनी कोणाची दु:ख जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही.उलट माजी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी तीन दिवसांचा दौरा करीत लोकनेता कसा असतो हे दाखवून दिले, तर उध्दव ठाकरे अभिनेत्या सारखे फिरून गेले,म्हणून भाजपच्या माध्यमातून आम्ही त्यांचा निषेध करतो असेही म्हणाले.
तौक्ते चक्रीवादळामुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या वैभववाडी, देवगड, कणकवली मतदारसंघात मुख्यमंत्री जातील अशी अपेक्षा होती. पण मुख्यमंत्र्यांनी केवळ चिवला बीचवर येऊन पुन्हा माघारी गेले. कुठल्याही नुकसानग्रस्तांशी त्यांना भेटावेसे वाटले नाही. त्यामुळे सिंधुदर्गवासीयांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोर निराशा केलीय. इथल्या जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम त्यांने केलेय.
श्री.राणे यंानी व्हिडिओ कॉन्सफरन्सद्वारे पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मुख्यमंत्री ठाकरे यांचा दौरा हा लिपस्टिक दौरा असेल अशी टीका आम्ही काल केली होती. ते आज वास्तवात दिसून आलं. सकाळी सात पासून निवती, वायरी गावातील नुकसानग्रस्त तसेच पोलिस यंत्रणा मुख्यमंत्र्यांच्या येण्याची वाट बघत होती. पण मुख्यमंत्री केवळ चिवला बीचवर येऊन गेले. खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांचे राणे साहेबांवर अजूनही प्रेम आहे. त्यामुळे चक्रीवादळात राणेंच्या .चिवला बीचवरील घराचे काही नुकसान तर झाले नाही ना? हे पाहण्यासाठी मुख्यमंत्री तेथे कदाचित गेले असावेत असा टोलाही श्री.राणे यांनी लगावला.
राणे म्हणाले, पंतप्रधान मोदींन फक्त गुजरात दौरा केला. तेथील नुकसानग्रस्तांना एक हजार कोटींची मदत जाहीर केली असा आरोप विरोधक करत आहेत. मात्र ते आरोप निराधार आहेत. त्यांनी कोणतीही माहिती घेतलेली नाही. पंतप्रधानांनी नुकसानग्रस्त सर्वच राज्यांना मदत जाहीर केली आहे. त्याची आकडेवारी काही दिवसांतच समोर येईल. त्यावेळी नुकसानग्रस्तांना राज्य सरकार मदत करतंय की केंद्र सरकार हे देखील चित्र स्पष्ट होईल.
राणे म्हणाले, निसर्ग चक्रीवादळाने सिंधुदुर्गात ८ कोटीचं नुकसान झालं. त्यापैकी फक्त ४९ लाख रूपये प्राप्त झाले आहेत. तशी माहिती जिल्हाधिकारी यांनी आम्हाला दिलीय. पण जिल्हाधिकारी जर मुख्यमंत्र्यांना याबाबत चुकीची माहिती देत असतील तर आम्हाला हक्कभंग आणावा लागणार आहे. तसंच जर निसर्ग चक्रीवादळ भरपाईपोटी ८ कोटी आले असतील तर तसं जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात द्यावं.
ते म्हणाले, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद् फडणवीस यांनी रायगड, रत्नागिरी आणि त्यांनंतर सिंधुदुर्ग असा ७०० किलोमिटरचा दौरा केला. वादळामुळे नुकसान झालेल्या सर्व घटकांशी चर्चा केली. तसंच विधान सभेत आवाज उठवून नुकसान भरपाई मिळवून देऊ अशी ग्वाही दिलीय. फडणवीस यांच्या या दौऱ्यामुळे मुख्यमंत्री जागे झाले आअिण त्यांना सिंधुदुर्गात यावं लागलं असेही श्री.राणे म्हणाले.