नारायण राणे; वालावल येथे अन्नपूर्णा व भक्तनिवासाचे लोकार्पण…
कुडाळ,ता.१०: सिंधुदुर्गातील युवकांनी उद्योजक बनण्याचा संकल्प करावा आणि कष्ट करून उद्योजक व्हावे,असे आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका करून हे सरकार बनवाबनवीचे आहे,असे त्यांनी सांगितले. वालावल येथील श्री देव लक्ष्मी नारायण स्थानिक सल्लागार समितीच्या अन्नपूर्णा इमारत व भक्तनिवास उद्धाटन सोहळा श्री रामनवमीच्या पूर्वसंध्येला श्री राणे यांच्या हस्ते झाले.यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी,नीलम राणे, तहसीलदार अमोल पाठक, श्री देव लक्ष्मी नारायण स्थानिक सल्लागार समिती वालावल अध्यक्ष ऍड. संग्राम देसाई, सामाजिक कार्यकर्ते दत्ता सामंत, माजी जि प उपाध्यक्ष रणजीत देसाई, सरपंच निलेश साळसकर, राजेश कोचरेकर, मनोरमा चौधरी चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष दयानंद चौधरी, शेखर परब, डॉ मिलिंद कुलकर्णी, उपसरपंच संदेश मठकर, गुरू देसाई, माजी सरपंच राजा प्रभू तसेच सिंधुदुर्गसह गोवा मुबई सांगली भागातील भाविक आदी उपस्थित होते.
यावेळी राणे यांनी सांगितले की, माझा जिल्हा गरीब म्हणून कोणी उल्लेख केलेला मला आवडत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक घरामध्ये उद्योजक तसेच अधिकारी बनले पाहिजे.यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत.माझ्याजवळ जे खाते आहे या खात्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील युवकांना जास्तीत जास्त फायदा कसा देता येईल, यासाठी मी प्रयत्न करत आहे. आणि या प्रयत्नांना माझ्या जिल्ह्यातील युवकांनी सुद्धा साथ देणे तेवढेच गरजेचे आहे. आपण देव देवतांचे दर्शन घेतो देवस्थान जवळ मागणे मागतो पण रोजगार निर्मिती ही आपल्यालाच केली पाहिजे. देवतांचे आशीर्वाद हे नेहमीच आपल्या पाठीशी असणार पण आपण आळस झटकून कष्ट करून रोजगार निर्माण केला पाहिजे. असे त्यांनी यावेळी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पर्यटनाला चांगली संधी आहे.पर्यटनाच्या माध्यमातून व्यवसायही उभे राहत आहेत. अजूनही व्यवसाय उभे राहू शकतात त्यासाठी युवकांनी पुढे येणे गरजेचे आहे. आपली मानसिकता बदलून उद्योजक मानसिकता निर्माण केली पाहिजे असे आवाहनही त्यांनी यावेळी करून येत्या काही दिवसांमध्ये केंद्रीय पर्यटन मंत्री या जिल्ह्यात आणून पर्यटनाच्या विविध योजना या ठिकाणी राबविण्याचा माझा मानस आहे.असे यांनी सांगितले.