अमित सामंत; शिक्षण मंत्र्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे स्थानिकांवर अन्याय….
कुडाळ,ता.०१: पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबविल्यास स्थानिकांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात नव्याने शिक्षक भरती करताना स्थानिकांचा विचार करा, बाहेरचे उमेदवार या ठिकाणी आणल्यास त्यांना हाकलून लावू, असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिला आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे आपल्या आडमुठ्या धोरणामुळे जिल्ह्यातील उमेदवारांवर अन्याय करण्याचे काम करीत आहेत त्यामुळे काही झाले तरी परजिल्ह्यातील उमेदवारांना शाळेत रूजू होवू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. याबाबत श्री. सामंत यांनी प्रसिध्दी पत्रक दिले आहे.
यात त्यांनी असे म्हटले आहे की, पवित्र पोर्टल व्दारे भरती प्रक्रिया राबविली गेल्यास त्याचा फायदा बाहेरच्या लोकांना होणार आहे. त्यामुळे स्थानिक उमेदवार नोकर्यांपासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे येणार्या काळात स्थानिकांना कसे काय नोकरीत सामावून घेता येतील यासाठी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी योग्य तो निर्णय घ्यावा. बाहेरुन येणारे शिक्षक हे फक्त तीन वर्षे या ठिकाणी नोकरी करतात आणि त्यांनतर आपल्या गावात बदली करुन घेतात. त्यामुळे त्याचा फटका मुलांना सहन करावा लागतो. त्यामुळे नव्याने भरती प्रक्रिया राबविताना स्थानिक उमेदवाराचा विचार करा, अन्यथा नव्याने येणार्या शिक्षकांना हाकलून लावू, असे त्यांनी म्हटले आहे.