दिपक केसरकर; सावंतवाडीत आयोजित विज्ञान नाट्योत्सवाचे उत्साहात उद्घाटन…
सावंतवाडी,ता.२७: पुर्वीचे शिक्षण आणि आत्ताचे शिक्षण यात जमिन-आसमानाचा फरक आहे. मात्र आत्ता स्पर्धेच्या युगात शिक्षण घेताना मुलांनी व्यावसायिक शिक्षण घेवून बलशाली भारताचे नागरिक होण्यासाठी प्रयत्न करावा, तरच तुमच्याकडे बघण्याची कोणाची हिंमत होणार नाही, असे आवाहन आज येथे आयोजित राज्यस्तरीय विज्ञान महोत्सवात शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी केले. दरम्यान टाटा आणि हिंदुस्तान को ऑपरेटिव्ह या दोन कंपन्यात भविष्यात पंचवीस हजाराहून नोकर्यांची संधी आहे. त्यामुळे मुलांनी तांत्रिक शिक्षणावर भर द्यावा, कुठलेही काम कमी पणाचे नाही. त्यामुळे ते करताना प्रामाणिकपणे करण्याकडे भर द्यावा, असे त्यांनी सांगितले.
राष्टीय विज्ञात संक्रमण परिषद, सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार, राज्य शैक्षणिक प्रशिक्षण परिषद पुणे आणि सिंधुदुर्ग विज्ञान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज येथील बॅ नाथ पै सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय विज्ञान नाट्योत्सवाचे उद्घाटन श्री. केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी प्रकल्प संचालक उदय पाटील, उपसंचालक कमलादेवी आपटे, राज्य विज्ञान शिक्षण संस्थेच्या संचालिका राधा हतकरी, विभागीय शिक्षण उपसंचालक कोल्हापुर महेश चोथे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था प्राचार्य सुशिल शिरवलकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, विज्ञान विभाग प्रमुख तेजस्वीनी आळवेकर, प्रभाकर क्षीरसागर, प्रविण राठोड, शैलेश पई, वामन तर्फे, नारायण मानकर, कल्पना बोडके, अशोक दळवी, राजन पोकळे, नंदू गावडे, आबा केसरकर, नंदू शिरोडकर, विठ्ठल कदम आदी उपस्थित होते.