महिलांची नारळ लढविणे स्पर्धा रद्द ; फातिमा काॅन्व्हेंटमधील मुलांना मास्क, सॅनिटायझरसह अन्य साहित्याचे वाटप…
मालवण, ता. २ : येथील नारळी पौर्णिमा उत्सवात सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत व नगरसेवक यतिन खोत मित्रमंडळ आयोजित महिलांसाठी राज्यस्तरीय नारळ लढवणे स्पर्धा खास आकर्षण ठरत आहे. मात्र कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता गर्दी टाळण्यासाठी नारळ लढवणे स्पर्धा रद्द करण्यात आली. मात्र सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या यतीन खोत-शिल्पा खोत दाम्पत्याने आपल्या सामाजिक कार्यातून वेगळा आदर्श निर्माण केला आहे. शहरातील फातिमा काॅन्व्हेंटमधील मुलांना मास्क, सॅनिटायझर, धान्य, खाऊ वाटप केले. येथील मुलामुलींसोबत वेळ व्यतित केल्याचा आनंद सर्वाधिक समाधान देणारा असल्याच्या भावना खोत दाम्पत्याने व्यक्त केल्या.
यावेळी साक्षी मयेकर, दिया पवार, गणेश चिंदरकर, दीपेश पवार, दीपेश नार्वेकर यासह कॉन्व्हेंट येथील मुले व स्टाफ उपस्थित होते. खोत दाम्पत्याचे फातिमा काॅन्व्हेंट सोबत नेहमीच आपुलकीचे नाते राहिले असून याठिकाणी मदत व सहकार्य ते नेहमीच करतात असे उपस्थितांनी सांगत खोत दाम्पत्याचे विशेष कौतुक केले.
कुठलाही सामाजीक कार्यक्रम सुरू केल्यावर तो अखंड सुरू रहावा ही यतिन खोत व शिल्पा खोत यांची भावना असते. मात्र यावर्षी नारळी पौर्णिमा उत्सव प्रातिनिधिक स्वरूपात साजरा होणार असल्याने कोणत्याही स्पर्धा नाहीत. गेल्या काही वर्षात महिलांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध झालेली शिल्पा खोत यांच्या संकल्पनेतील नारळ लढवणे स्पर्धाही होणार नाही. मात्र कोरोना परिस्थितीत नियम पाळले पाहिजेत. आपल्या कृतीतून आदर्श निर्माण केला पाहिजे या भावनेतून यतीन खोत-शिल्पा खोत यांनी जपलेली सामाजिक बांधिलकी आदर्शवत अशीच आहे.