लोकसभेत आपला विजय निश्चित, त्याचा फायदा पदवीधर निवडणुकीत…

142
2
Google search engine
Google search engine
Google search engine

नारायण राणे; मतदान पद्धत जाणून कामाला लागा, कार्यकर्त्यांना आवाहन…

कुडाळ,ता.०१: लोकसभा निवडणुकीत आपला विजय निश्चित आहे. याचा फायदा आपल्याला कोकण पदवीधर निवडणुकीत नक्कीच होईल. या पदवीधर निवडणुकीची मतदान पद्धत समजावून घ्या आणि ती मतदारांपर्यंत पोहोचवा व महायुतीकडून निरंजन डावखरे यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले.

महायुतीची कोकण पदवीधर निवडणुक आढावा बैठक आज कुडाळ मध्ये आयोजित करण्यात आले होती. या बैठकीला मार्गदर्शन करताना श्री. राणे बोलत होते. यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, रणजित देसाई, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, अशोक दळवी, शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा वर्षा कुडाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, सुरेश गवस आदी उपस्थित होते.

यावेळी राणे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत आपला विजय होणार आहे, त्याचा फायदा आपल्याला कोकण पदवीधर निवडणुकीत नक्कीच होईल. लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या सर्वच घटक पक्षांनी चांगले काम केले. पदवीधर मतदार संघाची निवडणूक ही इतर निवडणुकांपेक्षा वेगळी आहे. मतदान करण्याची पद्धत वेगळी आहे. त्याविषयी आपण जाणून घ्या. जिल्ह्यात १८ हजार ५६४ मतदार आहेत. पण महायुतीच्या कार्यकर्त्यांची संख्या त्याहून मोठी आहे. त्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक तालुक्यात, जिल्हा परिषदेच्या मतदार संघात मतदान किती आहे याचा अभ्यास करावा, योग्य नियोजन करावे, असे केले तर या निवडणुकीत विजय आपलाच होईल हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची आवश्यकता नाही. पदवीधर मतदानरांना देशाला कोणाची गरज आहे ते माहित आहे. विकास कोण करू शकतो हे त्यांना माहित आहे. कोणती विचारसरणी देश मजबूत करू शकतो हे पदवीधरांना माहित आहे. त्यामुळे या पदवीधर मतदारांकडे जाणे आणि विनंती करणे एवढे काम केल्यास ही निवडणूक जिंकणे कठीण नाही. मागील निवडणूक आम्ही अनुभवली आहे. मित्र पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांशी कसे वागतात हे आपण अनुभवले आहे. पण त्याहीपेक्षा यावेळी पक्षावरची निष्ठा जास्तदाखवा. सिंधुदुर्ग जिल्हा हा अन्य जिल्ह्यांपेक्षा वेगळा आहे. या निवडणुकीत आपण जास्तीतजास्त मतदान करून दहावी, बारावीच्या निकालाप्रमाणे आपले वेगळेपण दाखवून द्या.

यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पदवीधर निवडणुकीच्या वेगळ्या मतदानाची माहिती सर्वांना करून दिली. मतदान करताना कोणती काळजी घेतली पाहिजे, हे मतदारांना सांगा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. मतदानाची पद्धती पदविधरांपर्यंत पोहोचावा असे आवाहन त्यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले. यावेळी आमदार नितेश राणे, प्रभाकर सावंत, अतुल काळसेकर, अशोक दळवी, अबिद नाईक, यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी दहावी परीक्षेमध्ये १०० टक्के गुण मिळवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिली आलेली सौजन्या संजय घाटकर हिचा सत्कार करण्यात आला. या आढावा बैठकीला भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार आणि मित्र पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

\