अर्चना घारे; सावंतवाडी मोफत “ब्रिज कोर्स”ला उत्स्फूर्त प्रतिसाद..
सावंतवाडी,ता.१६: येथील परफेक्ट अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम केले जात आहे. हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. त्यांचा हा प्रवास असाच सुरू राहून सिंधुदुर्गातील जास्तीत-जास्त विद्यार्थी अपेक्षित यशापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन राष्ट्रवादीच्या नेत्या अर्चना घारे यांनी आज येथे केले. दरम्यान परफेक्ट अकॅडमीचे सर्वेसर्वा राजाराम परब यांच्या मार्गदर्शना मुळे येथील विद्यार्थ्यांचे भविष्य घडत आहे. नीट, जेईई अशा परीक्षांमध्ये विद्यार्थी चमकत आहेत. ही बाब कौतुकास्पद आहे, असे ही त्यांनी सांगितले.
परफेक्ट अकॅडमीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या ब्रिज कोर्सच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी उपस्थित राहून त्या कोर्ससाठी सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी घारे म्हणाल्या, आपण जेव्हा शिक्षण घेत होतो तेव्हा फारसे मार्गदर्शन मिळत नव्हते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नसल्याने कोकणातील विद्यार्थी मागे पडत होता. मात्र आता दहावी आणि बारावीच्या निकालात आपण राज्यात प्रथम क्रमांकावर आहोत. हे निश्चित भूषणावह असले तरीही अजूनही विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही.मात्र आता परफेक्ट अकॅडेमी आणि आरपीडी विद्यालयाच्या वतीने यथायोग्य मार्गदर्शन मिळत आहे. सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांना उच्च पदस्थ शिक्षण देणाऱ्या योग्य संस्थांची ओळख आणि सर्वोत्तम डॉक्टर्स आणि इंजिनिअर्स घडविण्यासाठी कटिबद्ध असलेल्या परफेक्ट अकॅडेमीची साथ लाभणार आहे. स्वतः प्रा. राजाराम परब यांनी आयआयटीसारख्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेऊन आपली बौद्धिक क्षमता दाखवून दिली आहे. त्यांच्या ज्ञानाचा कोकणातील जास्तीत जास्त विद्यार्थी व पालकांनी लाभ घ्यावा
घारे पुढे म्हणाल्या, आरपीडी विद्यालय व परफेक्ट अकॅडेमीच्या मार्गदर्शनातून पुढील दोन वर्षात सिंधुदुर्गातील विद्यार्थी हा नक्कीच राष्ट्रीय पातळीवर छाप सोडणारा तयार होईल आणि सिंधुदुर्गचे नाव जगभरात पोचवण्यासाठी येथील विद्यार्थी नक्कीच नावारूपास आल्याशिवाय राहणार नाही,
यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष ऋत्विक परब, युवती काँग्रेसच्या अध्यक्षा सावली पाटकर, पूजा दळवी, सुनिता भाईप, सुधा सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी प्रा. परब यांनी घारे व सहकाऱ्यांचे स्वागत करून त्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रुपेश पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शितल कांबळी, परिमल धुरी, संदेश परब यांसह परफेक्ट अकॅडेमीच्या टीमने प्रयत्न केले.