अभियंताच्या विरोधात नाराजी; वीज खांबावरील साहित्य निकृष्ठ, स्थानिकांचा आरोप…
बांदा,ता.२४: मडूरा गावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यांच्या निष्क्रियतेमुळे गेले ४ दिवस वीज पुरवठा गायब आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण कडून अद्यापही कोणती कार्यवाही न झाल्याने ग्राहकांमध्ये संताप पसरला आहे. पहिल्याच अवकाळी पावसात महावितरणच्या मर्यादा उघड झाल्या असून सहाय्यक अभियंता अनिल यादव यांची तात्काळ बदली करावी, अशी मागणी स्थानिकांमधून होत आहे.
गेले ८ दिवस विजेचा खेळखंडोबा सुरू असल्याने नळ पाणीपुरवठाही ठप्प झाला आहे. त्यामुळे वृद्ध महिलांसह नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. तसेच उन्हाळ्यात वीज वाहिन्यांवरील झुडपांची सफाई न केल्याने मडूरा गाव अद्यापही अंधारात आहे.
दरम्यान ठेकेदार व महावितरणचे अधिकारी यांची मिलीभगत असल्याने वीज खांबावर वापरण्यात येणारे साहित्य अत्यंत निकृष्ठ असल्याने या समस्या वारंवार निर्माण होत आहे. तसेच केवळ वीज बिले वसुलीसाठी ते तत्परता दाखवितात. काम मात्र शून्य असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. अशा निष्क्रिय अधिकाऱ्याची बदली करावी, अशी मागणी वीज ग्राहकांनी केली. याबाबत अनिल यादव यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल स्विच ऑफ होता.