वीज कंपनीचे लेखी पत्र; ठाकरे सेनेचे पदाधिकारी आक्रमक, अधिकार्यांना विचारला जाब…
सावंतवाडी,ता.२७: शहरातील गंजलेले खांब पावसाळ्यापुर्वी बदलण्यात यावेत या मागणीसाठी आज ठाकरे सेनेच्या पदाधिकार्यांनी आज येथील वीज कंपनीच्या अधिकार्यांना घेराव घातला. यावेळी लेखी आश्वासन मिळे पर्यंत उठणार नाही, असा इशारा जिल्हा उपसंघटक शब्बीर मणियार यांनी दिला. दरम्यान येत्या १० जून पर्यंत गंजलेले पोल बदलण्यात येतील, असे उपकार्यकारी अभियंत्याच्या लेखी आश्वासनानंतर पदाधिकार्यांनी माघार घेतली. वेळेत काम झाले नाही तर अधिकार्यांना कार्यालयात बसू देणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.
बांदा येथे वीज वाहिनी पडून काल एका महिलेचा मृत्यू झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मणियार यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे सेनेच्या पदाधिकार्यांनी कनिष्ठ अभियंता दिपक खोरागडे यांची भेट घेतली. यावेळी शहरातील विज पुरवठा खंंडीत होत आहे. शहरातील मुख्य चौक तसेच दाट वस्ती गर्दीची ठिकाण असलेल्या अनेक जागेवरचे पोल गंजलेले आहेत. त्यामुळे पुन्हा मोठा अपघात होवू शकतो. त्यामुळे याबाबत योग्य ते नियोजन करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी बघतो, करतो असे सांगुन खोरागडे यांनी पदाधिकार्यांना असंबद्ध उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. यावेळी आम्ही लोकांच्या मागण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत. त्यामुळे नुसते आश्वासन न देता कार्यवाही नेमकी काय करणार? याबाबत लेखी आश्वासन द्या, अन्यथा आम्ही उठणार नाही, अशी भूमिका पदाधिकार्यांनी घेतली. यावेळी येत्या १० तारखे पर्यंत धोकादायक खांब बदलण्यात येतील, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी माघार घेतली.