चक्रीवादळ नुकसानीचा अहवाल पंधरा दिवस होऊन पाठवलाच नाही…

146
2
Google search engine
Google search engine
Google search engine

उद्यापर्यंत सादर न केल्यास कार्यालयाला टाळे; महाविकास आघाडीचा इशारा…

कणकवली,ता.२८: तालुक्यातील काही भागांमध्ये चक्रीवादळाने १५ दिवसांपूर्वी मोठे नुकसान झाले. यात फळबागायतीचे देखील मोठे नुकसान झाले. या फळबागायतींचे पंचनामे कृषी सहाय्यकांमार्फत झाल्यानंतर याचा अहवाल तहसीलदार व जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाला पाठवण्याची गरज होती. मात्र जिल्हा कृषी अधिकारी व तहसीलदार कार्यालयात हा अहवाल लेखी स्वरुपात पाठवला नाही अशी धक्कादायक बाबा आज महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने उघड केली. जर उद्यापर्यंत नुकसानीचा अहवाल पाठवला नाही तर कृषी विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकणार असा इशारा महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांनी प्रभारी तालुका कृषी अधिकारी अर्जुन जाधव यांच्या शिष्टमंडळाने संपर्क साधला असता अहवाल पाठवला, नंतर सांगतो, मी ओरोस ला आहे अशा उडवा उडवी च्या उत्तराने त्यांच्या मनमानी व भोंगळ कारभाराचा पर्दाफाश यावेळी झाला. कणकवली तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे या चक्रीवादळात नुकसान झाले असून, यातील काही शेतकऱ्यांचे पंचनामे कृषी सहाय्यकांमार्फत करण्यात आले. या केलेल्या पंचनाम्याचा अहवाल हा तातडीने देण्याची गरज होती. मात्र असा अहवाल दिलेला नसल्याने हे शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहण्याची भीती असल्याची बाब महाविकास आघाडीच्या निदर्शनास येताच युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यासह आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर व अन्य पदाधिकाऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर धडक दिली. ह्यावेळी कृषी अधिकारी कार्यालयात जबाबदार अधिकारी जागेवर नसल्याची बाब निदर्शनास येतात प्रभारी तालुका कृषी अधिकारी अर्जुन जाधव यांच्याशी श्री नाईक यांनी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी सारवासाराव करणारी उत्तरे देत अहवाल पाठवला अशी माहिती दिली. याच दरम्यान तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांना देखील श्री नाईक यांनी संपर्क साधला असता त्यांनी चक्रीवादळाच्या कृषी विभागाच्या नुकसानीचा अहवाल अद्याप प्राप्त नसल्याची माहिती दिली. त्यावर शिष्टमंडळाने अहवाल कृषी अधीक्षक कार्यालयाला पाठवला तर त्याची प्रत दाखवा किंवा आवक-जावक रजिस्टर ची नोंद दाखवा अशी मागणी करताच यावेळी उपस्थित असलेल्या कृषी पर्यवेक्षक श्रीमती सावंत यांनी अहवाल पाठवलेला व्हाट्सअप चा मेसेज दाखवला. यावर शिष्टमंडळाने संतप्त भूमिका घेत व्हाट्सअप वर शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अहवाल पाठवून शेतकऱ्यांची चेष्टा करता काय? असा सवाल उपस्थित केला.

यावेळी अर्जुन जाधव यांना तहसीलदार कार्यालयात बोलावून घेत त्यांच्याकडून याबाबतची सविस्तर माहिती घ्या व उद्या या संदर्भातील बैठक घ्या अशी मागणी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्याकडे केली. तर आज संध्याकाळपर्यंत तहसीलदार कार्यालयाला व जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला जर अहवाल पाठवला नाही तर कृषी विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकणार असा इशारा आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांनी दिला. तसेच प्रभारी तालुका कृषी अधिकारी अर्जुन जाधव यांच्या कार्यपद्धतीबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली. जबाबदारी झटकून देण्याचा प्रयत्न करून तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान करण्याचा प्रयत्न असे अधिकारी करत असतील तर महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या हितासाठी हिसका दाखवेल असा इशारा देखील देण्यात आला. यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप मांजरेकर, युवासेना उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, युवा सेना समन्वयक राजू राठोड, रोहित राणे, जय धुमाळे, संतोष पुजारे, प्रसाद अंधारी, रवी भंडारे आदी उपस्थित होते.

\