माजी नगरसेवकांचा पालिकेला सवाल; स्वतः पाहणी करून समस्या सोडवेन,मुख्याधिकारी…
सावंतवाडी,ता.२४: शहरातील नागरिकांना एक वेळ सुद्धा पाणी मुबलक मिळत नाही.परंतु पाळणेकोंड धरणात मुबलक पाणी असताना पाण्याच्या अडचणी का? असा सवाल येथील माजी नगरसेवकांनी पालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांना केला.दरम्यान प्रत्येक प्रभागात मी स्वतः येऊन पाहणी करून समस्या दूर करण्याचा प्रयत्न करू,असे आश्वासन यावेळी श्री जावडेकर यांनी माजी नगरसेवकांना दिले.माजी नगरसेवकांनी शहरातील पाण्याच्या प्रश्नना संदर्भात मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली.
यावेळी माजी नगरसेवक सुरेश भोगटे,सुनील पेडणेकर, विलास जाधव,उमाकांत वारंग,कीर्ती बोन्द्रे,अफरोज राजगुरू आदी उपस्थित होते.
गेले पंधरा दिवस खासकीलवाडा परिसरातील पाण्याची पाईप लाईन फुटल्यामुळे तेथील नागरिकांना पाणी मुबलक मिळत नाही.यावर कार्यवाही करावी अशी मागणी यावेळी उमाकांत वारंग यांनी केली.
पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य पाईप लाईन मध्ये काही अडचणी असेल तर ती दूर करावी, तसेच शहरात दोन वेळ पाणी पुरवठा करण्यास शक्य नसेल तर निदान या दिवसात एक तास तरी चांगल्या प्रकारे पाणी पुरवठा करा,अशी मागणी यावेळी उपस्थित नगरसेवकांनीं केली.